ममता बॅनर्जींच्या भाचीचा घरात मृतदेह; नोकरी गेल्यापासून नैराश्य, २६ हजार नियुक्त्या रद्द करणाऱ्या भरती घोटाळ्याची पुन्हा चर्चा!

बीरभूम : पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नातेवाईक बृष्टी मुखर्जी (२८) हिचा बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट येथे मृत्यू झाला. कुसुंबा गावातील तिच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत मंगळवारी तिचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा संशय आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून तपास सुरू केला आहे.
नोकरी गेल्यानंतर मानसिक तणावात होती बृष्टी

बृष्टी मुखर्जीने सरकारी शाळेत शिक्षकेतर कर्मचारी म्हणून काम केले होते. पश्चिम बंगालमधील बहुचर्चित शाळा भरती गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयीन आदेशानंतर मोठ्या प्रमाणावर नियुक्त्या रद्द करण्यात आल्या. त्यात बृष्टीची नोकरीही गेली. मार्च २०२३ मध्ये तिच्यावर या निर्णयाचा परिणाम झाला होता. सुमारे २६ हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय कलकत्ता उच्च न्यायालयाने दिला होता आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवला.


कुटुंबीयांच्या माहितीनुसार, नोकरी गमावल्यानंतर बृष्टी गेल्या काही वर्षांपासून नैराश्याचा सामना करत होती आणि तिच्यावर उपचार सुरू होते. तिचे नाव नोकरी गमावलेल्या उमेदवारांच्या यादीत ६०८व्या क्रमांकावर असल्याचे वृत्त आहे. तिच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर नोकरी गमावलेल्या उमेदवारांच्या मानसिक आणि सामाजिक परिस्थितीचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे.
ममता बॅनर्जींच्या कुटुंबाशी नेमका संबंध काय?
बृष्टी ही बीरभूममधील कुसुंबा गावातील रहिवासी होती. तिचे वडील निहार मुखर्जी हे ममता बॅनर्जी यांचे मातुल चुलत भाऊ असून स्थानिक तृणमूल काँग्रेसचे नेते असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या घटनेला स्थानिक राजकीय पातळीवरही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
पोलिसांकडून मृत्यूच्या परिस्थितीचा तपास
मंगळवारी दुपारी घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत बृष्टीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रामपूरहाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवला आहे. मृत्यूच्या परिस्थितीचा तपास सुरू असून शवविच्छेदन अहवाल आणि इतर कायदेशीर प्रक्रियेनंतर नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
‘कॅश-फॉर-जॉब’ प्रकरणाने बंगालमध्ये माजवली होती खळबळ
पश्चिम बंगालमधील २०१६ सालच्या शाळा भरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार हे ममता बॅनर्जी सरकारच्या काळातील मोठ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांपैकी एक ठरले. कथित पक्षपात आणि पैशांच्या देवाणघेवाणीतून नियुक्त्या झाल्याच्या आरोपांनंतर हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या रद्द करण्यात आल्या. या प्रकरणात तत्कालीन शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांच्यासह सत्ताधारी पक्षाशी संबंधित नेते आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई झाली होती.
बृष्टीच्या मृत्यूमुळे या जुन्या भरती प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मात्र तिच्या मृत्यूमागे नोकरी जाणे हेच कारण होते, असा निष्कर्ष पोलिस तपास पूर्ण होण्यापूर्वी काढता येणार नाही. सध्या शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.