राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनाआधी फडणवीसांनी केली मोठी घोषणा; काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुंबई : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 11 वे अधिवेशन आज बंगळुरूमध्ये पार पडत आहे. या अधिवेशनात सामाजिक न्याय, ओबीसी समाजाचे हक्क आणि विविध मागण्यांवर व्यापक चर्चा होणार आहे. देशभरातून ओबीसी समाजाचे प्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या अधिवेशनासाठी उपस्थित आहेत.
अधिवेशनाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. जातीय जनगणनेत ओबीसी कॉलमचा समावेश केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात मंजूर होणारे ठराव राज्य सरकारकडून अंमलात आणले जातील, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या 11 व्या अधिवेशनासाठी देशभरातून आलेले प्रतिनिधी, माता-भगिनी, युवा सहकारी आणि महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचे फडणवीस यांनी स्वागत केले. अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी महासंघाला शुभेच्छाही दिल्या.


हे अधिवेशन केवळ विचारविनिमयाचे व्यासपीठ नसून सामाजिक न्याय, सामाजिक समरसता आणि राष्ट्रनिर्माणाला नवी दिशा देण्याची संधी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
भारताची ताकद विविधतेत असून या विविधतेला सामाजिक समरसतेचा आधार आहे. समाजातील कोणत्याही व्यक्तीचे मूल्य तिच्या जात किंवा पार्श्वभूमीवर नव्हे, तर तिची प्रतिभा आणि चारित्र्य यावर ठरले पाहिजे, असे फडणवीस यांनी सांगितले.
महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक योगदानाचाही त्यांनी उल्लेख केला. शिक्षण, सामाजिक परिवर्तन, समान संधी आणि सामाजिक न्यायासाठी या महापुरुषांनी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी असल्याचे फडणवीस म्हणाले. ‘ओबीसी समाज हा भारताच्या विकास यात्रेचा सशक्त आधार आहे,’ असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.