ठाकरे गटानंतर आता पवार गटालाही मोठा धक्का? 6 खासदारांच्या फुटीनंतर मविआत नव्या राजकीय भूकंपाची चर्चा

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या राजकीय धक्क्यातून ठाकरे गट सावरत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील काही खासदारही सत्ताधारी NDA च्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी महाविकास आघाडीची चिंता वाढवली आहे.

राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार गटातील काही खासदार सध्या सत्ताधारी नेत्यांशी संपर्कात असून आगामी काळात मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, तीन खासदार सक्रियपणे संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, या चर्चांबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
ठाकरे गटातील 6 खासदारांच्या फुटीमुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अस्वस्थता वाढल्याचे चित्र दिसत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आघाडीत सर्व काही सुरळीत असल्याचे मानले जात होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींमुळे विरोधकांच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते आपल्या पुढील राजकीय वाटचालीबाबत विचार करत आहेत. त्यामुळे संपर्क, बैठका आणि पक्षांतराच्या चर्चांना वेग आला आहे.

दरम्यान, पक्षातील संभाव्य नाराजी रोखण्यासाठी आणि खासदारांशी संवाद कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरे गटातील फुटीनंतर आता पवार गटातही मोठी राजकीय उलथापालथ होणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.