ठाकरे गटाला मोठा धक्का? ‘ऑपरेशन टायगर’वरून नवी खळबळ; ७ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदार लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करू शकतात, अशी चर्चा रंगली असतानाच ‘ऑपरेशन टायगर’ संदर्भात नवे दावे समोर आले आहेत.

शिवसेना आमदार कृपाल तुमाने यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे. त्यांनी दावा केला की, ठाकरे गटातील तब्बल सात खासदार हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. विकासकामे आणि मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी शिंदे यांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
तुमाने यांच्या मते, या संदर्भातील चर्चा केवळ प्राथमिक स्तरावर नसून अनेक बाबी निश्चित झाल्या आहेत. योग्य वेळ येताच या घडामोडी प्रत्यक्षात दिसतील, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे आगामी काळात ठाकरे गटातील खासदारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, अलीकडेच ठाकरे गटाने आपल्या खासदारांची बैठक घेतली होती. या बैठकीत काही खासदार प्रत्यक्ष उपस्थित राहिले तर काहींनी ऑनलाइन सहभाग नोंदवला. मात्र पक्षाच्या अंतर्गत कार्यपद्धतीबाबत काही खासदारांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. पक्षप्रमुखांकडून अपेक्षित संवाद आणि सहकार्य मिळत नसल्याची भावना काही नेत्यांमध्ये असल्याचे बोलले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर दिल्लीतही काही महत्त्वाच्या भेटीगाठी झाल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरे गटातील काही खासदारांनी केंद्रीय राज्यमंत्री आणि शिंदे गटाचे वरिष्ठ नेते प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. या हालचालींमुळे राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे, दिल्लीतील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तातडीने राजधानी गाठल्याची माहिती मिळत आहे. पक्षातील संभाव्य नाराजी दूर करण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.