पावसाळी अधिवेशनाचं बिगुल वाजलं! ‘या’ तारखेपासून होणार सुरुवात, राजकीय वातावरण तापणार

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख अखेर निश्चित झाली आहे. कामकाज सल्लागार समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून यंदाचे अधिवेशन राजकीयदृष्ट्या अत्यंत वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत पार पडलेल्या बैठकीनुसार हे पावसाळी अधिवेशन येत्या २२ जूनपासून सुरू होणार असून १० जुलैपर्यंत चालणार आहे. सुमारे तीन आठवड्यांच्या या कालावधीत राज्यातील विविध महत्त्वाचे आणि वादग्रस्त मुद्दे सभागृहात चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील अटीवरून राजकीय वातावरण तापले आहे. दोन लाखांवरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम स्वतः भरावी लागणार असल्याने या अटीवर विरोधकांकडून तीव्र आक्षेप नोंदवला जात आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या अटीविरोधात तीन दिवसांचे अन्नत्याग आंदोलन केले होते. प्रशासनाकडून आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले असले तरी हा मुद्दा अधिवेशनात चांगलाच गाजण्याची चिन्हे आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही अधिवेशनाच्या कालावधीवर टीका करत, हे अधिवेशन जनतेच्या प्रश्नांपेक्षा पुरवणी मागण्या मंजूर करण्यापुरतेच मर्यादित ठेवले जात असल्याचा आरोप केला आहे. अधिवेशन अधिक कालावधीचे असायला हवे होते, असेही त्यांनी नमूद केले.
दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या हालचाली आणि ‘ऑपरेशन टायगर’ या चर्चांवरूनही राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर प्रादेशिक पक्ष फोडण्याच्या राजकारणाचा आरोप करत तीव्र टीका केली आहे.
एकूणच, २२ जूनपासून सुरू होणारे हे पावसाळी अधिवेशन राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडवणारे आणि अत्यंत वादळी ठरणारे असे मानले जात आहे.