दिवंगत नेते अजित पवार यांच्या दूरदृष्टीकोणातून जिल्हा परिषदेचे कामकाज; उरुळीकांचन येथे घनकचरा प्रकल्प – विरधवल जगदाळे यांची ग्वाही….

उरुळी कांचन : जिल्हा परिषदेमार्फत दिवंगत नेते अजित पवार यांच्या योगदानातून घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्था व जिल्ह्याला शैक्षणिक दर्जा उंचवावा म्हणून स्मार्ट शाळांची उभारणी ही ग्रामीण भागाचे भविष्य घडविणारी कामे जिह्यात मार्गी लागली आहे. त्यांची उणीव भासत असली तरी त्यांच्यातील दूरदृष्टीपणातील कामे मार्गी लावण्याचा जिल्हा परिषदेचा कयास असून उरुळीकांचन शहरात कचऱ्यापासून विघटन करुन उप-पदार्थ निर्मितीचा प्रकल्प साकारण्यात येईल अशी ग्वाही पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विरधवल(बाबा) जगदाळे यांनी व्यक्त केला आहे.

उरुळी कांचन येथील’ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’ संचलित’उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप’च्या विद्यमाने रविवारी (दि.१४) जागतिक रक्तदान दिनाच्या औचित्य साधून बी.जी.शिर्के बाल विकास मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी गजानन पाटील,हवेलीचे गटविकास शेखर शेलार,जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती जितेंद्र बडेकर, जिल्हा परिषद सागर शेलार, पंचायत समितीचे सदस्य सुदर्शन चौधरी,कोमल कांबळे,सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष के.डी.कांचन,देविदास भन्साळी,बाजार समितीचे संचालक राजाराम कांचन,महादेव कांचन,आदी मान्यवर उपस्थित होते.

विरधवल जगदाळे म्हणाले, जिल्हा परिषदेला दिवंगत नेते अजित पवार यांच्यामुळे अर्थिक स्थैर्य मिळाले. पुणे जिल्हा परिषद हीजिल्ह्यातील सार्वांगिण विकासासह नागरीकांच्या आरोग्य व घनकचरा व्यवस्थापनात मोठे कार्य करीत आहे. अजित पवार यांच्या दूरदृष्टीकोणातून स्मार्ट शाळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय धर्तीवर ग्रामीण भागातील गरीब जनतेला शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे. स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे आरोग्य सेवेचा लाभ जनतेला होऊ लागला आहे असेही ते म्हणाले.

गजानन पाटील म्हणाले, ड्रीम युवा सोशल फाऊंडेशनचे काम निश्चितच कौतुकास्पद आहे. तरुण सामाजिक विचारसणीत एकत्र येऊन पर्यावरण पुरक कामे तसेच विकासाची जबाबदारी उचलतात घेऊन दिशादर्शन काम करणे हे एक सामाजिक दायित्वाचे भान आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उरुळीकांचन गावासाठी घनकचरा प्रकल्पासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे.
सभापती जितेंद्र बडेकर म्हणाले, उरुळीकांचन गावात जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्राचे स्मार्ट दवाखाना काम पूर्ण झाले आहे. त्याप्रमाणेच घनकचरा प्रकल्पाने गाव स्वच्छ राहून कचऱ्याची समस्याची मार्गी लागणार असल्याने या कामासाठी सर्वांची सहकार्याची गरज आहे. स्मार्ट शाळा अंतर्गत गावात एक प्राथमिक शाळा विकसित करण्यात येईल असे ते म्हणाले.
दरम्यान,कडक उन्हाळ्यात देखील उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप’वरील विश्वासाहर्तेमुळे या रक्तदान शिबिरात एकूण ८०६ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला,यापैकी २५ महिला व ७८१ पुरुष होते.