अमरावती, अकोला आणि वर्ध्यावर थेट संकट; पुढील 12 तासांसाठी मोठा अलर्ट..

मुंबई : राज्यात उष्णतेचा कहर वाढत चालला असून भारतीय हवामान विभागाने गंभीर इशारा दिला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती, अकोला आणि वर्धा येथे तापमान 46 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

फक्त विदर्भच नव्हे तर मराठवाड्यातही उष्णतेची लाट तीव्र होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे कोकणात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्यावर सध्या दुहेरी संकट ओढावले आहे. काल वर्धा येथे 46.5 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. अकोला, यवतमाळ आणि अमरावती येथेही पारा 45 अंशांच्या पुढे गेला. आजही अमरावती, अकोला आणि वर्धा येथे सूर्य अक्षरशः आग ओकणार असल्याचा अंदाज आहे. हिंगोली, यवतमाळ, नांदेड आणि नागपूरमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार आहे.

तर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून याठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, वाढत्या तापमानामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावे आणि उष्माघातापासून काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अकोल्यात उष्माघातामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. असदगड किल्ल्याच्या पायथ्याशी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. तीव्र उष्णतेमुळे नाकातून रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, वाशिम जिल्ह्यातही उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत असून नागरिक हैराण झाले आहेत. जिल्ह्यात 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यातच सुरू असलेल्या डिझेल तुटवड्यामुळे शेतकरी आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाशिममधील पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी लांबलचक रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.