पुणे शहरात दोन महिन्यांत तब्बल साडेसहा हजार नागरिकांना श्वानांचा चावा; वाढत्या घटनांनी चिंता वाढली..

पुणे : पुणे शहरात भटक्या श्वानांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. गेल्या सहा महिन्यांत तब्बल १७,६३९ नागरिकांना श्वानांनी चावा घेतल्याची नोंद नायडू रुग्णालयाच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. तर केवळ जानेवारी २०२६ मध्ये ३,४४८ आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये ३,०५५ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

सप्टेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत श्वानदंशाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ दिसून येत आहे. याच दरम्यान पुणे महानगरपालिकेकडून मोठ्या प्रमाणात नसबंदी आणि लसीकरण मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत ५४,७२० नसबंदी शस्त्रक्रिया आणि १,९४,८०१ अँटी-रेबीज लसीकरण करण्यात आले आहे.
तरीही श्वानदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. “एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई होत असताना आकडे कमी का होत नाहीत?” असा सवाल पुणेकर विचारत आहेत.

महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून भटके श्वान पकडणे, त्यांची नसबंदी आणि लसीकरण करून पुन्हा त्याच भागात सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार या उपाययोजनांमुळे श्वानांची संख्या आणि रेबीजचा धोका नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दरम्यान, नागरिकांनी भटक्या श्वानांना चिडवू नये, लहान मुलांना एकटे सोडू नये आणि श्वानदंश झाल्यास तातडीने उपचार घ्यावेत, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. मात्र वाढत्या घटनांमुळे अधिक प्रभावी आणि दीर्घकालीन उपाययोजनांची मागणी जोर धरू लागली आहे.