हॅलो मी शरद पवार बोलतोय, पवारांचा फोन आणि विषयच संपला! मणिपूरमध्ये अडकलेली मुलं सुखरूप पोहोचली..

बारामती : शरद पवार हे देशातील एक मोठे आणि नेहेमी चर्चेत असणारे नेते आहेत. अनेकांच्या मदतीला ते धावून जात असतात. आता एक फोन फिरवून शरद पवारांनी धुमसणाऱ्या मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या मुलांची सुटका केली.
यामुळे या मुलांच्या पालकांचा जीवात जीव आला. हे पालक पवारांच्या भेटीला आले होते. सांगलीतल्या जत तालुक्यातले काही विद्यार्थी हे मणिपूरमध्ये शिक्षणाच्या निमित्ताने वास्तव्यास आहेत. मात्र मणिपूर हिंसाचार होत आहे.
जत तालुक्यातल्या आवंडी गावाचे रहिवासी संभाजी कोडग यांचा मुलगा मयूरने आपल्या वडिलांना फोन केला. मणिपूरची परिस्थिती सांगितली आणि चारही बाजूंना गोळीबार होतोय. कदाचित हा माझा शेवटचा फोन असेल असेही सांगितले. यामुळे पालकांची चिंता वाढली.
त्यानंतर संभाजी कोडग यांनी बारामती तालुक्यांतील शेतकरी प्रल्हाद वरे यांना फोन केला. मणिपूरच्या दंगलीत महाराष्ट्रातली १० मुले हॉस्टेलवर अडकल्याचे सांगितले आणि त्यांना काहीही करून वाचविण्याची विनंती केली. त्यानंतर ५ मे रोजी आपण शरद पवारांना भेटू असे वरे यांनी संभाजी कोडग यांना सांगितले.
त्यानंतर प्रल्हाद वरे यांनी शरद पवारांचे खासगी सचिव सतीश राऊत यांचा संपर्क क्रमांक दिला. संभाजी कोडक यांनी सतीश राऊत यांना सर्व परिस्थिती सांगितली. सतीश राऊत यांनी ही सगळी परिस्थिती ऐकली आणि शरद पवार यांना तातडीने हा निरोप दिला.
नंतर पवार यांनी तातडीने मणिपूरच्या राज्यपालांना फोन केला. त्यानंतर महाराष्ट्रातल्या १० मुलांसह दुसऱ्या राज्यातील दोन मुलांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जा, अशी विनंती केली. यानंतर संभाजी कोडग यांचा मुलगा मयूरला मणिपूर लष्कराच्या चीफ कमांडरचा फोन आला आणि आम्ही तुम्हाला सुरक्षित स्थळी नेत आहोत, असे त्याला सांगितले.
यामुळे पालकांच्या जीवात जीव आला. यामुळे पवार अनेकांच्या मदतीला जातात, हे पुन्हा एकदा दिसून आले.