राज्यात 30-31 मार्चला वादळी वाऱ्यासह गारपीट, शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन, कुठे बरसणार? जाणून घ्या…

मुंबई : सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. ही परिस्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. कर्नाटक आणि तेलंगणा सीमेलगत असलेल्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये या बदलाचा अधिक प्रभाव जाणवू शकतो.येत्या 30 आणि 31 मार्चदरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

30 मार्च रोजी खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तसेच वादळी वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता असून विजांचा कडकडाटही होऊ शकतो. राज्यातील हवामानात सध्या लक्षणीय बदल दिसून येत असून दुपारनंतर पाऊस, जोरदार वारे आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.
तसेच वादळी वाऱ्यांपासून आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. पुढील काही दिवस हवामानाचा अद्ययावत अंदाज नियमितपणे तपासून शेतीची कामे नियोजनबद्ध करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. राज्यातील हवामान पुढील दोन दिवस अस्थिर राहण्याची शक्यता आहे.

यामुळे नागरिकांनीही तयार राहण्याचे आव्हान केले आहे. 31 मार्च रोजीदेखील राज्याच्या काही भागांमध्ये या अस्थिर हवामानाचा परिणाम कायम राहण्याचा अंदाज आहे. उर्वरित विदर्भातही हवामानात बदल होऊन ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. रब्बी हंगामातील पिकांची काढणी सध्या सुरू असल्याने शेतकऱ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे.
अचानक येणाऱ्या पावसामुळे काढणी केलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत, तसेच झाकण्यासाठी ताडपत्री किंवा इतर उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे.