सुनेत्रा पवार शपथविधीपासून ते अजित पवारांच्या अपघातापर्यंत…., शरद पवारांनी दिली सर्व प्रश्नांची उत्तरं

बारामती : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान २८ जानेवारीला अपघातामध्ये निधन झालं.त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळालं. सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

अशातच आता दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलनीकरणाबाबत चर्चा सुरू झाल्या. मात्र, या मुद्द्यावरून मत मतांतरे पाहायला मिळत आहेत. अशातच आता शरद पवार यांनी बुधवारी बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेत अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे.
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी सोहळ्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर मला भाष्य करायचं नाही. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी झाला, संधी दिली आनंद आहे. परस्परांना धीर देणं आणि पुढे कसं जायचं याकडे आमचे लक्ष आहे.

राजकीय निर्णयाबद्दल आम्ही कोणाशीही चर्चा केलेली नाही. सुनेत्रा पवार मला भेटायला आल्या तर मी त्यांना आनंदाने आशीर्वादे देईल, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी पक्ष विलीनीकरणाच्या मुद्यावर शरद पवार म्हणाले की, या सर्व चर्चेत फडणवीस कुठेच नव्हेत, त्यामुळे त्यांना याबाबत भाष्य करण्याचा कोणताही अधिकार नाही. सध्या चर्चाच झाली नसताना त्याबद्दल भाष्य करणं योग्य नाही. माझा उल्लेख का केला हे समजलं नाही. असे ते म्हणाले.
अजित पवार यांचे स्मारक उभारण्याबाबत शरद पवार म्हणाले की, पेपरमध्ये वाचलं की आम्ही स्मारक उभारणार आहोत, पण ही गोष्ट मला माहिती नाही. त्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे. मला ते ठावूक असलं पाहिजे, मात्र मी याबद्दलची नुसती चर्चा ऐकली आहे. याबद्दल काय करायचं याबद्दल एकत्र बसून चर्चा करू.
अजित पवार यांचा विमान अपघात हा घातपात असल्याची शंका अनेकांनी व्यक्त केली, याबाबत शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलंय की, ऑथेंटिक माहिती मिळत नाही तोपर्यंत मी अपघातासंदर्भात उगीचच शंका घेणार नाही. असे देखील म्हणाले आहे.
