काळजी घ्या! बर्ड फ्लूमुळे राज्यात पुन्हा हायअलर्ट, प्रशासनाने घेतला मोठा निर्णय…


पटना : बर्ड फ्लूचा धोका पुन्हा एकदा राज्यात समोर आला आहे. यामुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे. पटना शहरातील IGIMS परिसरात १५ ते २० मृत पक्षी आढळल्यानंतर बर्ड फ्लूचा धोका लक्षात घेऊन आरोग्य आणि वन विभागाने हायअलर्ट जारी केला आहे.

संभाव्य संसर्ग प्राणिसंग्रहालयातील प्राणी व पक्ष्यांपर्यंत पोहोचू नये, यासाठी प्रशासनाने तात्काळ कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. तसेच ३० जानेवारी २०२६ रोजी हे प्रकरण समोर आल्यानंतर कोणतीही जोखीम हलक्यात न घेण्याचा निर्णय घेत संपूर्ण शहरात सतर्कता वाढवण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर संजय गांधी जैविक उद्यान (पटना प्राणिसंग्रहालय) पूर्णपणे अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. बाहेरून संसर्ग आत येऊ नये आणि आतून बाहेर पसरू नये, यासाठी कर्मचाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.

प्राणी आणि पक्ष्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी सुरू असून कोणतीही संशयास्पद लक्षणे आढळल्यास त्वरित अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्राणिसंग्रहालयात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांच्या शूज आणि वाहनांच्या टायरांची तपासणी व निर्जंतुकीकरण अनिवार्य करण्यात आले आहे.

दोन्ही मुख्य प्रवेशद्वारांवर पोटॅशियम परमॅंगनेटचा फवारा मारून शूज आणि टायर स्वच्छ केले जात आहेत. प्रवेशद्वाराजवळ पाणी साठवून त्यात निर्जंतुकीकरणाचे द्रव्य मिसळण्यात आले असून प्रत्येक व्यक्तीला त्यातून जावे लागणार आहे. हे उपाय काहीसे गैरसोयीचे असले तरी सुरक्षेसाठी अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, प्राणिसंग्रहालय परिसरात स्वच्छतेच्या नव्या आणि कडक पद्धती लागू करण्यात आल्या आहेत. नियमित निर्जंतुकीकरण मोहिमा राबवण्यात येत असून कर्मचाऱ्यांना संरक्षणात्मक साधने वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पक्षी आणि प्राण्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून कोणतीही असामान्य स्थिती आढळल्यास त्वरित वैद्यकीय तपासणी केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!