वातावरणात मोठा बदल! आजची परिस्थिती काय असेल?, जाणून घ्या संपूर्ण माहिती…

पुणे : गेल्या दोन महिन्यांपासून कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले होते. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सातत्याने मुसळधार पावसाचा इशारा देण्यात येत होता.

या मुसळधार पावसामुळे रस्ते बंद, ठिकठिकाणी पाणी साचणे आणि जनजीवन विस्कळीत होण्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र आजपासून हवामानात मोठा बदल झाला असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईत आज तुलनेने वातावरण शांत राहील. काही भागांत हलक्या रिमझिम सरी पडू शकतात, मात्र मुसळधार पावसाचा धोका नाही. दिवसभर आभाळ दाटून राहील. कमाल तापमान ३० अंश सेल्सियस, तर किमान तापमान २५ अंश सेल्सियस असेल. वारा साधारण ताशी १२-१५ किलोमीटर वेगाने वाहणार आहे. सततच्या पावसानंतर आज हवामान शांत झाल्याने मुंबईकरांना मोकळा श्वास घेता येईल.

ठाणे आणि नवी मुंबईत गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचले होते. परंतु आज वातावरण सौम्य राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या भागांत केवळ हलक्या सरी पडतील, मात्र मुसळधार पावसाची शक्यता नाही.

कमाल तापमान २९ ते ३० अंश सेल्सियस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सियस असेल. वाऱ्याचा वेग प्रतितास 10–13 किलोमीटर राहील. नागरिकांनी आवश्यक कामासाठी घराबाहेर पडताना दिलासा मिळेल, अशी परिस्थिती आहे.
पालघर जिल्ह्यात आज रिमझिम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून किंचित उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. तापमान २४ ते २९अंश सेल्सियस दरम्यान राहील.
दरम्यान, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मागील दोन महिन्यांपासून सातत्याने मुसळधार पाऊस होत होता. मात्र आज पावसाची तीव्रता कमी झाली आहे. काही ठिकाणी तुरळक रिमझिम, तर काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. कोणताही हवामान अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.