खासगी क्षेत्रातील कामगारांना सरकारचा मोठा धक्का! कामाचे तास वाढणार, नवा नियम लवकरच लागू होणार…


मुंबई : महाराष्ट्रातील खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकार दुकाने, हॉटेल्स, मॉल्स आणि विविध खासगी आस्थापनांमधील कामाचे तास ९ वरून १० करण्याच्या तयारीत आहे.

यासाठी महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (रोजगार नियमन व सेवा अटी) अधिनियम, २०१७ मध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कामगार विभागाने हा प्रस्ताव सादर केला.

मात्र, काही तरतुदींवर मंत्र्यांनी अधिक स्पष्टीकरण मागितल्याने सध्या अंमलबजावणी थांबवण्यात आली आहे. तरीही हा कायदा लागू झाल्यास खासगी क्षेत्रातील कामगारांच्या दैनंदिन कामाच्या स्वरूपात मोठा बदल होणार आहे.

कामाचे तास १० – कायद्याच्या कलम १२ मध्ये बदल करून दिवसाचे कमाल कामाचे तास १० करण्यात येणार आहेत.

सलग कामाचा कालावधी वाढणार: सध्या ५ तासांनंतर अर्धा तास विश्रांती देणे बंधनकारक आहे. हे प्रमाण वाढवून ६ तास केले जाणार आहे.

ओव्हरटाईम तास वाढणार – ३ महिन्यांतील कमाल ओव्हरटाईम मर्यादा १२५ तासांवरून १४४ तासांपर्यंत वाढवली जाईल.

दिवसातील कमाल काम १२ तास – ओव्हरटाईम धरून दिवसात जास्तीत जास्त १२ तास काम घेता येईल. सध्या ही मर्यादा १०.५ तास आहे.

तातडीच्या कामासाठी अपवाद – तातडीच्या परिस्थितीत १२ तासांची मर्यादा लागू राहणार नाही.

कायद्याची व्याप्ती बदलणार – सध्या हा कायदा १० किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांवर लागू होतो. नव्या तरतुदीनुसार तो फक्त २० किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनांवर लागू होईल.

दरम्यान, या प्रस्तावातील आणखी एक महत्त्वाची तरतूद म्हणजे महिलांना रात्री उशिरापर्यंत काम करण्याची मुभा मिळू शकते. सरकारचं म्हणणं आहे की यामुळे महिलांच्या रोजगार संधींमध्ये वाढ होईल. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने नियोक्त्यांना आवश्यक ती पावलं उचलावी लागतील.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!