मोठी बातमी! ‘या’ कारणास्तव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलणार? जाणून घ्या सविस्तर…

पुणे : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, नगर परिषद, नगर पंचायत आणि महापालिका निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये भाजप हा राज्यात सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला असून, अनेक महापालिकांमध्ये महापौरपदासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत.

अशातच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय वातावरण आणखी तापलं आहे. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या पाच फेब्रुवारी रोजी राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर सात फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे, आता त्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे जालना जिल्ह्यातल्या जवळपास ४७५ ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात संपत आहे, मात्र याच कालावधीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होणार असल्यानं आणि परीक्षांचा हंगाम पाहता या ग्रामपंचायतींच्या निवडणुका चार महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे या गावांचा कारभार आता प्रशासकांच्या हाती जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

फेब्रुवारी महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये अनेक मोठ्या लोकसंख्येच्या गावांचा समावेश आहे, त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी निवडणुका होणे अपेक्षित आहे, मात्र याच निवडणुकीच्या काळात दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्यामुळे या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या संभाव्य उमेदवारांना आता प्रतिक्ष करावी लागू शकते.
या घडामोडींमुळे राज्यातील ग्रामपंचायत स्तरावरील राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांना आता काही महिने प्रतीक्षा करावी लागू शकते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतरच ग्रामपंचायत निवडणुकांचा नवा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
