अर्ज सुरू होणार की नाही? लाडकी बहीण योजनेवर अदिती तटकरेंनी दिलं मोठं उत्तर…

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

त्यामुळे अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. मात्र, सध्या नव्याने अर्ज प्रक्रिया सुरू होणार का? या प्रश्नामुळे अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडत हा संभ्रम दूर केला आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या योजनेसाठी नव्याने अर्ज नोंदणी सुरू करण्यात आलेली नाही. ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी नवीन अर्ज प्रक्रिया सध्या बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांना सध्या नवीन नोंदणी करता येणार नाही. मात्र, आधीच अर्ज केलेल्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अत्यावश्यक करण्यात आली आहे.

ई-केवायसी करताना काही महिलांकडून चुका झाल्याचे लक्षात आल्यानंतर शासनाने त्यांना दिलासा देत दुरुस्तीची संधी दिली आहे. अशा महिलांना 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसी सुधारण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र लाभार्थींनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे.

ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान काही ठिकाणी महिलांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. जळगावमध्ये एका महिलेकडे ई-केवायसी करून देण्याच्या नावाखाली गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे..
दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना मंत्री अदिती तटकरे यांनी महिलांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. कोणत्याही मध्यस्थावर विश्वास ठेवू नये, कोणत्याही आमिषाला बळी पडू नये आणि ई-केवायसी प्रक्रिया स्वतः मोबाईलवरून किंवा जवळील अंगणवाडी सेविकांच्या मदतीनेच करावी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.