‘विहिरीतून निघालं गरम पाणी, गाव हादरलं!’ अकोल्यातील गूढ घटनेनं वाढवलं कुतूहल; तज्ज्ञ तपासणीची मागणी

अकोला : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील आलेगाव येथे घडलेल्या एका अनोख्या घटनेने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले आहे. गावातील खासगी विहिरीतून सलग तीन दिवस उबदार पाणी येत असल्याचा दावा समोर आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये आश्चर्य, कुतूहल आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नेहमीप्रमाणे वापरात असलेल्या विहिरीचे पाणी अचानक गरमसर का झाले, याचे उत्तर अद्याप मिळाले नसल्याने या घटनेची शास्त्रीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

आलेगाव येथील शेतकरी अरुण मूर्तडकर यांच्या मालकीची ही विहीर पिण्याच्या पाण्यासह शेती आणि घरगुती वापरासाठी वापरली जाते. काही दिवसांपूर्वी पाणी भरताना ते स्पर्शाला नेहमीपेक्षा उबदार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुरुवातीला हा तात्पुरता बदल असावा, असे वाटले. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही परिस्थिती कायम राहिल्याने त्यांनी ही माहिती शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर अनेक ग्रामस्थांनी विहिरीवर जाऊन स्वतः पाणी तपासून पाहिल्याचा दावा केला.
विशेष म्हणजे, विहिरीतील मोठ्या प्रमाणात पाणी मोटारीद्वारे उपसल्यानंतर काही वेळात झऱ्यांमधून पुन्हा भरून आलेले पाणीही तितकेच उबदार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे केवळ उन्हामुळे पाणी गरम झाले, हा मुद्दा ग्रामस्थांनी फेटाळला असून भूगर्भात काही वेगळी प्रक्रिया सुरू असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा (GSDA), भूगर्भशास्त्र विभाग आणि आरोग्य विभागाने घटनास्थळी भेट देऊन पाण्याचे तापमान, रासायनिक गुणधर्म, खनिजांचे प्रमाण आणि भूगर्भातील बदलांची सखोल तपासणी करावी, अशी मागणी केली आहे. अधिकृत तपासणी होईपर्यंत या पाण्याचा वापर करताना काळजी घ्यावी, असे मतही काही नागरिकांनी व्यक्त केले आहे.

भूगर्भशास्त्राशी संबंधित जाणकारांच्या मते, पृथ्वीच्या पोटातील नैसर्गिक उष्णतेमुळे काही भागात भूजलाचे तापमान वाढू शकते. पावसाचे पाणी जमिनीत खोलवर झिरपल्यानंतर ते उष्ण खडकांच्या संपर्कात आल्यास पुन्हा झऱ्यांमधून वर येताना उबदार स्वरूपात बाहेर पडते. काही ठिकाणी गंधक किंवा इतर खनिजांचे प्रमाण अधिक असल्यासही पाण्याच्या तापमानात बदल जाणवू शकतो. मात्र आलेगावातील घटनेमागे यापैकी कोणते कारण आहे, हे वैज्ञानिक तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
सध्या या घटनेबाबत कोणत्याही शासकीय विभागाने अधिकृत निष्कर्ष जाहीर केलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर सुरू असलेल्या विविध चर्चांपेक्षा तज्ज्ञांच्या अहवालाची प्रतीक्षा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, अकोल्यातील ही घटना राज्यभर चर्चेचा विषय ठरली असून, साध्या विहिरीत अचानक उबदार पाणी येण्यामागचे नेमके रहस्य काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाची तपासणी आणि वैज्ञानिक अहवालानंतरच या गूढ घटनेमागील सत्य समोर येणार आहे.