एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार का? अखेर सस्पेन्स संपला; महायुतीतून मोठा खुलासा

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांनी बंड करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडीनंतर शिवसेना शिंदे गटाकडे खासदारांची संख्या ७ वरून थेट १३ वर पोहोचली असून, महायुतीतील तो सर्वात मोठा मित्रपक्ष ठरला आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार का?” अशी जोरदार चर्चा सुरू झाली. या चर्चांवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच स्पष्ट भूमिका मांडत सर्व तर्क-वितर्कांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, “ज्या राज्यात सरकार स्थापनेसाठी १४७ आमदारांचे बहुमत आवश्यक असते आणि ज्या पक्षाकडे स्वतःचे १३७ निवडून आलेले आमदार आहेत, त्या पक्षाचाच मुख्यमंत्री राहणार हे स्वाभाविक आहे. त्यामुळे अशा अफवा किंवा चर्चांमुळे मी विचलित होत नाही.”

ते पुढे म्हणाले, “ही वस्तुस्थिती एकनाथ शिंदे यांनाही चांगली माहिती आहे. त्यामुळे अशा बातम्यांचा आमच्यावर कोणताही परिणाम होत नाही. प्रत्येकाला स्वतःची राजकीय स्वप्ने पूर्ण करण्याची इच्छा असते, त्यात काही गैर नाही.”

दरम्यान, ठाकरे गटातील बंडखोरांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्यामागे “विकासकामांसाठी निधी मिळत नव्हता” हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले आहे. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, “निधी हे एक कारण असू शकते, पण तेवढेच नाही. विकास प्रकल्प, सामाजिक प्रश्न, सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातील भूमिका आणि नेतृत्वावरील विश्वास अशा अनेक गोष्टींमुळेही पक्षांतराचे निर्णय घेतले जातात.”
राजकारणात नेते आणि कार्यकर्ते आपल्या भविष्यासाठी निर्णय घेत असतात. ज्या नेतृत्वाखाली आपण काम करत आहोत, ते आपले राजकीय भविष्य सुरक्षित करू शकत नाही, अशी भावना निर्माण झाली तर पक्षांतर होणे हीही नैसर्गिक बाब असल्याचे मतही फडणवीस यांनी व्यक्त केले.