महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? नुकसान ग्रस्त भागात तरी जाणार का?: रमेश चेन्नीथलाचां हल्लाबोल

पुणे : मराठवाड्यासह राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीसह मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. ५० लाख हेक्टर पेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाले आहे, १०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला तर शेकडो जनावरे दगावली आहेत. या पार्श्वभूमीवरच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसचे सरचिटणीस यांनी हल्लाबोल चढवला आहे.

महाराष्ट्र संकटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारमधील एकही मंत्री महाराष्ट्रातील नुकसानीची पाहणी करण्यास आला नाही, शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यास आले नाहीत. पुढील महिन्यात पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यावेळी तरी ते शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार आहेत का? असा रोखठोक सवाल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी विचारला आहे.पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांची आढावां बैठक प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी ते बोलत होते.
दरम्यान रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी संकटात असताना सरकारची मदत मात्र अद्याप मिळालेली नाही. हेक्टरी ५० हजार रुपये देण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे पण सरकारने एक दमडीही दिलेली नाही. फक्त मदतीच्या पोकळ घोषणा करण्यात आल्या आहेत. महायुतीने निवडणुकीत शेतकरी कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. आता हीच योग्य वेळ आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची पण सरकार मात्र त्यावर काहीच बोलत नाही.प्रशासनातील अधिकाऱ्यांना परिस्थितीचे काही गांभीर्य आहे का नाही, असा सवाल रमेश चेन्नीथला यांनी विचारला आहे.
