मेळघाटात वीज कोसळल्याने दोन ठार, प्रचंड गारपीट झाल्यामुळे आंबा-केळी-द्राक्ष बागांचे नुकसान

जालना : काल जळगाव तालुक्यासह जामनेर, पारोळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. अमरावती जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह गारपीट झाली आहे. मेळघाटमध्ये वीज कोसळून दोन जण ठार झाले आहेत. तसेच चार जण जखमी झाले आहेत. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
चुणीलाल सावरकर (वय ४५) व सुरेश जामूनकर (वय ४५) या दोघांचा मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये सोमवारी रात्री अचानक वातावरणात बदल झाला. त्यानंतर अवकाळी पाऊस सुरू झाला. दिवसभर कडाक्याचे ऊन अन् रात्रीच्या वेळी वादळी वारा तसेच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. यामुळे शेतीचे नुकसान झाले.
प्रचंड वेगाने असलेल्या वादळी वाऱ्यामुळे दाणादाण उडाली. त्यानंतर अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला. या अवकाळी पावसामुळे शेतात कापून ठेवलेल्या मका, बाजरीसह विविध पिकांचे नुकसान झाले. जालनामधील बदनापूर तालुक्यात वादळी वा-याच्या पावसाचा जोर अधिक होता. या पावसामुळे द्राक्ष बागांबरोबर केसर आंब्याच्या बागांचे नुकसान झाले.
गारपिटीमुळे गारांचा खच बागेत पडला होता. परभणीच्या सेलू तालुक्यातील हिस्सी येथे अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत कापसासह कडबा जळाला आहे. अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांची केळी काढणीला आली होती.
असे असताना अचानक वादळी वाऱ्यामुळे आलेल्या पावसाचा केळीच्या बागेला मोठा फटका बसला. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून वादळी वा-यासह पाऊस होत आहे. त्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात अवकाळी पाऊस झाला.