जुन्नर येथे शेततळ्याच्या पाण्यात बुडून दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

जुन्नर : शेततळ्यात बुडून दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी परिसरात आज मंगळवारी (ता.28) दुपारी ही घटना घडली आहे.

सोहम जयसिंग नवले (वय 12) आणि अभि महेश पवार (वय 10, दोघेही रा. पागरीमाथा, बल्लाळवाडी, ता. जुन्नर) अशी मृत मुलांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बल्लाळवाडी येथील धरण मार्गावर सुरू असलेल्या बांधकाम व सुधारणा कामांजवळ असलेल्या शेततळ्यात खेळत असताना ही मुले बुडाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांचे पथक व बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून गावावर शोककळा पसरली आहे.
