‘पुढचे 48 तास अत्यंत धोकादायक!’ मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा इशारा; 6 जुलैपर्यंत अतिमुसळधार पाऊस, शाळा बंद, घराबाहेर पडण्यापूर्वी हे वाचा

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे, नाशिक आणि साताऱ्याच्या घाटमाथा भागात 6 जुलैपर्यंत अतिमुसळधार पाऊस, वादळी वारे आणि स्थानिक अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाकडून जारी होणाऱ्या प्रत्येक अलर्टचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, हवामान विभागाच्या अंदाजानुसार परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून दर तीन तासांनी नागरिकांना सूचना पाठवण्यात येत आहेत. संभाव्य पूरस्थिती, झाडे कोसळणे, रस्ते जलमय होणे आणि वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन विविध जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. NDRF आणि SDRFची पथके संवेदनशील भागात तैनात असून स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबईसह एमएमआरमध्ये अनेक सखल भागांत पाणी साचले असून रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम होत आहे. भरतीच्या काळात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत हवामान इशारे, आपत्कालीन सूचना आणि प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे
