…तर अहमदाबादसारखी विमान दुर्घटना मुंबईतही होऊ शकते, आमदारानं व्यक्त केली चिंता, केली मोठी मागणी


अहमदाबाद : अहमदाबादमध्ये गुरुवारी विमानाचा भीषण अपघात झाला, दुपारी दीड वाजेच्या सुमारास लंडनला जाण्यासाठी एअर इंडियाच्या विमानानं अहमदाबादहून उड्डाण केलं, आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणातच हे विमान एका इमारतीवर कोसळलं.

या विमान दुर्घटनेत आतापर्यंत २६५ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. हे विमान कोसळल्यानंतर दुर्घटनास्थळावरून विमानाचे अवशेष आणि मृतदेह बाहेर काढण्याचे काम रात्रभर सुरू आहे.

या भीषण दुर्घटनेनंतर मुंबईतील संभाव्य धोका अधोरेखित करत आमदार दिलीप लांडे यांनी एक गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, अहमदाबादसारखी घटना मुंबईच्या कुर्ला बैल बाजार झोपडपट्टी परिसरात घडली तर प्रचंड जीवितहानी होऊ शकते.

मुंबईच्या विमानतळाच्या अत्यंत जवळ मोठ्या झोपडपट्ट्यांचा विस्तार आहे. अनेक विमानं कमी उंचीवरून उड्डाण करतात किंवा लँडिंग करतात. त्यामुळे जर विमानातील कोणतीही तांत्रिक बिघाडाची घटना येथे घडली, तर तिचं रूपांतर थेट विनाशात होण्याची शक्यता आहे. आमदार लांडे यांनी या भागातील तत्काळ पुनर्वसन व हटवणूक करण्याची मागणी केली आहे.

दिलीप लांडे यांनी सांगितलं की, हा मुद्दा मी विधानसभेत उपस्थित केला होता. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं होतं.” आता त्यांनी या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांना औपचारिक पत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, जर अहमदाबादप्रमाणे मुंबईत अशी दुर्घटना घडली, तर केवळ प्रवासी नव्हे तर हजारो झोपडपट्टीत राहणाऱ्यांचे प्राण संकटात येतील. त्यामुळे ही बाब हलक्याच घेण्यात येऊ नये, असं ते म्हणाले.

दरम्यान, अहमदाबाद दुर्घटनेत पवईमध्ये राहणारे पायलट सुमित सभरवाल यांचाही मृत्यू झाला. आमदार दिलीप लांडे यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि संवेदना व्यक्त केल्या. या भेटीदरम्यानच त्यांनी झोपडपट्टी हटवण्याची मागणी प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!