राजाला संपवलं, मध्यप्रदेशात आली, प्रियकराला भेटली अन्….,धक्कादायक माहिती आली समोर

इंदूर : लग्नानंतर अवघ्या १२ दिवसांनी इंदूरहून हनिमूनसाठी मेघालयला गेलेल्या नवविवाहित राजा आणि सोनम रघुवंशी या जोडप्याच्या प्रवासाचा अंत एका भीषण हत्येने झाला. राजा रघुवंशी याचा मृतदेह एका खोल दरीत सापडल्याने प्रकरण अधिक धक्कादायक ठरलं. चौकशीतून समोर आलेल्या माहितीने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे.

सोनमने तिच्या प्रियकरासोबत मिळून राजाच्या हत्येचा कट रचला आणि मारेकऱ्यांमार्फत राजाला संपवलं. या प्रकरणात आता एक नवीन माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी मंगळवारी दावा केला की पूर्व उत्तर प्रदेशातील एका ढाब्यावर गोंधळलेल्या आणि विस्कळीत अवस्थेत दिसलेली सोनम रघुवंशी मेघालयात तिच्या पतीच्या हत्येनंतर काही दिवसांनी इंदूरला परतली होती.
ती तीचा प्रियकर राज कुशवाहाला तो रहात असलेल्या भाड्याच्या खोलीत येऊन भेटली आणि तीथे दोघांनी पुढचा डाव आखला. २४ वर्षीय सोनम रघुवंशी २३ मे रोजी पूर्व खासी हिल्समधील वेई सावडोंग धबधब्याजवळून गायब झाली होती. जिथे ती आणि तिचा पती राजा रघुवंशी (२८) हनिमूनसाठी गेले होते.

२ जून रोजी राजाचा मृतदेह धबधब्याच्या पार्किंग लॉटजवळील एका दरीत सापडला. दरम्यान सोनम बेपत्ता होती. ९ जून रोजी गाजीपूरमध्ये तिच्या पुन्हा येण्याने प्रकरणाचे गूढ आणखी वाढले.

इंदूर पोलिसांनी सांगितले की, जो दावा तीने केला तो खोटा होता. तिचे कधीही अपहरण झाले नव्हते. आमच्याकडे माहिती आहे की सोनम २५ मे ते २७ मे दरम्यान ट्रेनने इंदूरला पोहोचली आणि देवास गेटमधील भाड्याच्या खोलीत राहिली, असे अतिरिक्त डीसीपी (गुन्हे शाखा) राजेश दंडोटिया यांनी सांगितले. “तिचा सहआरोपी राज कुशवाहा तिला तिथे भेटला. नंतर त्याने तीला उत्तर प्रदेशला जाण्यासाठी टॅक्सीची व्यवस्था केली. असेही अधिकारी म्हणाले.
तीला उत्तर प्रदेशला का पाठवण्यात आले हे पोलिसांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. तीने ज्या ज्या मार्गांनी प्रवास केला ते शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. तीने केलेला प्रवास जाणूनबुजून गोंधळात टाकणारा असल्याचे तपासकर्त्यांनी म्हटले आहे.
रेल्वे रेकॉर्डवरून असे दिसून येते की तिने २३-२४ मे नंतर गुवाहाटीहून पाटणाला ट्रेनने प्रवास केला असावा. “आमच्याकडे गुवाहाटी-पाटणा ट्रेनमधून उतरतानाचे सीसीटीव्ही फुटेज आहे. तपासकर्त्यांची दिशाभूल करण्यासाठी हा मार्ग निवडण्यात आला होता.” असे उत्तर प्रदेशातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
इंदूर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या सहा दिवसांनी आणि हनीमूनच्या तीन दिवस आधी म्हणजे, १७ मे रोजी राजाच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. सोनम १५ मे रोजी तिच्या पालकांच्या घरी परतली आणि तीने दुसऱ्या सिमवरून राजशी पुन्हा संपर्क साधला. १६ मे रोजी ते तासन् तास बोलत होते.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी, राज त्याचे तीन बालपणीचे मित्र आकाश राजपूत, विशाल सिंग चौहान आणि आनंद कुर्मी यांना इंदूरच्या सुपर कॉरिडॉरमधील एका रेस्टॉरंटमध्ये भेटला. जिथे हत्येचे नियोजन करण्यात आले होते. हे तिघे इंदूरहून नवी दिल्लीमार्गे गुवाहाटीला जाणाऱ्या ट्रेनने निघाले.आणि २१ मे रोजी शिलाँगला पोहोचले.