छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीतून शरद पवार गटाची माघार, आता पाठिंबा कोणाला? महत्वाची माहिती आली समोर…

बारामती : येथील इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी आणि शेतकरी कृती समितीने एकत्र येत उमेदवार जाहीर केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक एकत्र आल्याने ही निवडणूक नेमकी कशी होणार याकडे सभासदांचे लक्ष लागले होते.
असे असताना शरद पवार गटाने आपल्याला उमेदवारी न मिळाल्याने माघार घेतली असल्याचे सांगितले आहे. पॅनलमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली नसल्याने हा निर्णय घेतला आहे. याबाबत तालुका अध्यक्ष टेजसिंह पाटील यांनी माहिती दिली आहे.
ते म्हणाले, खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठींबा दिल्यानंतर सर्वपक्षीय पॅनल जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र तस झालं नाही. ना विरोध ना समर्थन अशी घोषणा त्यांनी केली आहे. दरम्यान, या कारखाण्याची निवडणूक 10 वर्षांनी होत असल्याने मोठ्या नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या.
यामध्ये भाजपकडून तानाजी थोरात यांनी देखील पॅनल उभे केले आहे. तसेच सुनील काळे यांनी देखील पॅनल उभे केले आहे. दोन दिवसांपूर्वी अजित पवार आणि जाचक यांची युती पुन्हा एकदा तुटल्याची चर्चा झाली होती. जागा वाटपात मेळ बसत नसल्याने जाचक नाराज असल्याच्या चर्चा झाल्या. अखेर याबाबत आता घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आता पुढील काळात कारखान्यावर कोणाची सत्ता येणार हे लवकरच समजेल.
दरम्यान, आता रंगत वाढली असून राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कृती समितीकडे इच्छुकांची संख्या मोठी होती. वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेतले जावेत यासाठी दोन दिवसापासून इच्छुक उमेदवार यादी जाहीर होईल, असे सांगितले जात होते, मात्र तसे झाले नाही. या यादीतील उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी अगदी काल उशिरापर्यंत बैठका सुरू होत्या.