विना तिकीट प्रवासावर रेल्वेचा ‘स्ट्रिक्ट अॅक्शन मोड’; दंड दुप्पट, नियमभंग केल्यास तुरुंगवासाचीही शक्यता

मुंबई : भारतीय रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात मोठा आणि कठोर निर्णय घेतला आहे. आता वैध तिकीटाशिवाय प्रवास करणाऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त दंड भरावा लागणार आहे. नवीन तरतुदीनुसार दंडाची रक्कम 250 रुपयांवरून थेट 500 रुपये करण्यात आली आहे. हा दंड मूळ तिकीट भाड्याव्यतिरिक्त असेल.

हा नियम केवळ तिकीट नसलेल्या प्रवाशांपुरता मर्यादित नसून बनावट, वापरलेले किंवा नियमबाह्य तिकीट वापरणाऱ्यांनाही लागू होणार आहे. म्हणजेच कोणत्याही प्रकारे चुकीचे तिकीट वापरून प्रवास केल्यास अतिरिक्त शुल्क आणि दंड आकारला जाईल.
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की ही कारवाई रेल्वे कायदा 1989 मधील कलम 137 आणि 138 अंतर्गत केली जाईल. तिकीट तपासणीदरम्यान जर प्रवासी दोषी आढळला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

जर एखाद्या प्रवाशाने दंड आणि भाडे भरले नाही, तर प्रकरण थेट न्यायालयात जाऊ शकते. अशा परिस्थितीत सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होण्याचीही तरतूद आहे.

रेल्वेच्या आकडेवारीनुसार, दर महिन्याला लाखो प्रवासी विना तिकीट प्रवास करताना पकडले जातात. त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल केला जातो. त्यामुळे विना तिकीट प्रवास ही रेल्वेसाठी मोठी समस्या बनली आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी वैध तिकीट घेण्याचे आणि नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.