उरुळीकांचन येथे पुनर्वसन जमीनीच्या ताब्यावरुन पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्याला शिवीगाळ दमदाटी! पंधराहून अधिक जणांवर गुन्हा दाखल! पोलिसांची एकतर्फी कारवाईचा शेतकऱ्यांचा आरोप…

उरुळीकांचन : पुनर्वसन खरेदी क्षेत्राच्या ताब्यावरुन मूळ जमिनीची वहिवाट असलेल्या पंधराहून अधिक शेतकऱ्यांनी ताबा घेणाऱ्या पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्याला जमाव जमवून शिवीगाळ करुन हातपाय मोडण्याची धमकी देण्याचा प्रकार उरुळीकांचन येथे घडला असून या प्रकरणी पोलिसांनी पंधराहून अधिक जणांवर जमाव जमवून धमकाविल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

अलंकार बाळासाहेब कांचन (वय.३२ वर्षे रा.खेडेकर मळा उरुळी कांचन ता. हवेली जि. पुणे) असे पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्याचे नाव असून उरुळीकांचन पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळीकांचन गट क्र. ४५४/२ मधील पुनर्वसन जमीन अन्य एका खरेदीदाराकडून पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन यांनी खरेदी केली आहे. या जमिनीत ताबा टाकण्यासाठी अलंकार कांचन हे मंगळवार (दि.२८ )आले असता त्यांना बेकायदा जमाव जमावून ‘ तू येथे परत दिसला तर तुझे हातपाय तोडू तू इथे थांबायचे नाही दिसायचे नाही ही जमीन आम्हीच घेणार आहोत असे’ म्हणून त्यांना व जे.सी.बी मशीन वरील चालक यांना पंधराहून अधिक शेतकऱ्यांना शिवीगाळ दमदाटी केल्याची तक्रार केली आहे.

त्यानुसार सतीश भगवान कांचन, अमोल विठ्ठल कांचन, अविनाश विठ्ठल कांचन, रितेश भगवान कांचन ,कैलास गोपाळ कांचन, धनाजी गोपाळ कांचन, पांडुरंग बाजीराव कांचन, निलेश पांडुरंग कांचन, सचिन वाल्मीक कांचन, तसेच कमल वाल्मीक कांचन, शोभा पांडुरंग कांचन ,मीना सचिन कांचन, अमोल विठ्ठल कांचन, यांची पत्नी( पूर्ण नाव माहित नाही) अविनाश विठ्ठल कांचन, यांची पत्नी (पूर्ण नाव माहित नाही) सतीश भगवान कांचन, यांची पत्नी (पूर्ण नाव माहित नाही) रितेश भगवान कांचन यांची पत्नी( पूर्ण नाव माहित नाही) सर्व (रा. इरिगेशन कॉलनी उरुळी कांचन ता. हवेली जि. पुणे ) अशा जणांवर बेकायदा जमाव जमविल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १२९, ११५, १२६, ३५१(२), ३५२(३)३५२ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा सहाय्यक तपास पोलिस अधिक बाजगिरे हे करीत आहेत.
पोलिसांनी आमच्यावर केलेली कारवाई एकतर्फी -शेतकरी..
सदर दाखल झालेली कारवाई ही पूर्णपणे नि:पक्षने केलेली नसल्याचा आरोप मूळ वहिवाटअसलेल्या वगुन्हा दाखल झालेल्या शेतकऱ्यांनी केला आहे. या जमिनी संदर्भात न्यायालयात दावे सुरु असताना बेकायदेशीरपणे जमिनीचा ताबा घेतल्याचा दावा या शेतकऱ्यांनी केला आहे. पोलिसांनी आमच्यावर दाखल झालेल्या अन्यायाची नोंद घेतली नसून कारवाई एकतर्फी केली असल्याचा संताप गुन्हा दाखल झालेल्या शेतकऱ्यांनी केला आहे.