राजकारणात ‘पावर पॉलिटिक्स’चा गेम ON! महामंडळ वाटपावर महायुतीत अंतिम हालचाली; इच्छुक नेत्यांची धडपड शिगेला

मुंबई : सत्तेच्या पडद्यामागे सध्या जोरदार हालचाली सुरू असून महायुती सरकारमधील बहुप्रतिक्षित महामंडळ वाटपाचा मुद्दा आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. वर्षभरापासून प्रतीक्षेत असलेल्या इच्छुक नेत्यांमध्ये आता मोठी अस्वस्थता आणि उत्सुकता पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या संपूर्ण प्रक्रियेला गती देत महामंडळ वाटप लवकरात लवकर पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत चर्चांना आणि लॉबिंगला मोठा वेग आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत किंवा महिन्याभरात राज्यातील विविध महामंडळांवरील नियुक्त्यांची अधिकृत यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. प्राथमिक चर्चेनुसार भाजपला सुमारे ४८ टक्के, शिवसेनेला २९ टक्के आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जवळपास २० टक्के वाटा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अंतिम फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही.

दरम्यान, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत या वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रत्येक पक्षाकडून आपापल्या कोट्यातील महामंडळांवर कोणत्या नेत्याची वर्णी लागणार याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

महामंडळांवरील पदे ही केवळ सन्मानापुरती नसून प्रशासकीय निर्णय प्रक्रियेतही त्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे या पदांसाठी महायुतीतील इच्छुक नेत्यांमध्ये मोठी स्पर्धा सुरू झाली असून लॉबिंग शिगेला पोहोचले आहे.
याचदरम्यान राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. १६ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांसाठी मतदान होणार असून १८ जून रोजी मतदान आणि २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. एका पोटनिवडणुकीसह एकूण १७ जागांवर राजकीय ताकद आजमावली जाणार आहे.
या निवडणुकांनंतर महामंडळ वाटपाच्या प्रक्रियेला आणखी वेग येणार असून पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.