मॉन्सून अपडेट! 15 राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा मोठा इशारा

मुंबई : मॉन्सूनचा पाऊस रेंगाळला असून, भारतीय हवामान विभागाने पुढील काही तास आणि दिवसांसाठी पावसाचा मोठा इशारा दिला आहे. 12 आणि 13 जून रोजी उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता असून, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

काही भागात उष्णतेचा जोर कायम राहणार असून, राज्यात अजूनही मॉन्सूनचा पूर्ण प्रवेश झालेला नाही. पुढील 10 तासांसाठी 15 राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही राज्यांमध्ये ताशी 90 किलोमीटर वेगाने वारे आणि गारपिटीची शक्यताही वर्तवली आहे.
दरम्यान, पुढील काही दिवसांत तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली असली तरी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये उष्ण व दमट वातावरण कायम आहे. कुलाबा येथे 36 अंश तर सांताक्रूझ येथे 35.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे.

मुंबईत मॉन्सूनचा प्रवेश साधारण 10 ते 11 जूनदरम्यान होतो, मात्र यंदा अनुकूल हवामान नसल्याने तो लांबणीवर पडला आहे. 18 जूनपर्यंत मॉन्सून राज्यात पूर्णपणे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मॉन्सून उशिरा येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पेरण्या रखडल्या असून मान्सूनपूर्व शेतीकामे अंतिम टप्प्यात आली आहेत. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत शेतजमीन पेरणीसाठी सज्ज करत आहेत.