मोबाईल चोरीला गेला, तक्रार द्यायला गेला तर पोलिसांनी हाकलून दिलं, यूपीएससीचा निकाल लागण्यापूर्वी बिरदेव डोणेसोबत विचित्र अनुभव..

कोल्हापूर : कागल येथील बिरदेव सिद्धाप्पा डोणे हा युवक नुकताच आयपीएस झाला. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला तेव्हा बिरदेव हा बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील एका खेडेगावातील माळरानावर मेंढरे चारत होता. त्याने आजपर्यंत मोठा संघर्ष केला आहे. यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.
आयपीएस झालेल्या बिरदेव डोणे याला काहीच दिवसांपूर्वी पोलिसांचा विचित्र अनुभव आला होता. तेव्हा त्याला पोलिसांनी चांगली वागणूक दिली नाही. बिरदेवचा फोन चोरीला गेला होता. यूपीएससीची मुलाखत दिल्यानंतर बिरदेव डोणे पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनी अभ्यासकेंद्रातून जात असताना त्याचा मोबाईल चोरीला गेला.
चोरीची तक्रार देण्यासाठी त्याने पोलिस ठाणं गाठलं खरं पण ठाण्यात त्याला विचित्र अनुभव आला. पोलिसांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्याची तक्रार देखील घेतली नाही. त्यामुळे त्याला तिथून तसंच जावं लागलं. घरचे रागावतील म्हणून त्याने फोन हरवल्याचं घरी सांगितलं नाही. मोबाईल बंद पडल्याने दुरुस्तीला टाकला असल्याचं सांगितलं.
त्यांना नंतर एका मित्राने फोन दिला होता. आता हाच बिरदेव डोणे आज आयपीएस झाला असून पोलिस खात्यात सुपर क्लास वन अधिकारी झाला आहे. त्याच्या अखत्यारितील पोलिसांना शिस्त लावण्याची जबाबदारी बिरदेववर असणार आहे. यामुळे या घडलेल्या चोरीची चर्चा आता चांगलीच गाजत आहे.
दरम्यान, गावाचा बिरदेव देशभरातल्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरलाय. राहायला घर नाही, वीज नाही. अशा परिस्थितीत बिरदेवनं हार न मानता UPSC ची Exam क्रॅक केली. एका सामान्य धनगराचा मुलगा IPS Officer झाल्यानं सगळेच त्याचं कौतुक करत आहे. यामुळे त्याच्या जिद्दीला अखेर मोठं यश मिळाले आहे.