विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! CJP आंदोलनातील गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे निर्देश

मुंबई : NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर देशभरात झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलिसांना दिल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन छेडल्यानंतर देशभरात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, आंदोलन संपल्यानंतरही काही राज्यांमध्ये आंदोलक विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून कारवाई सुरू असल्याचा आरोप CJPने केला होता.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, आंदोलन मागे घेण्याच्या वेळी आंदोलकांवर पुढील कोणतीही कारवाई केली जाणार नाही आणि दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जातील, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, काही राज्यांमध्ये गुन्हे दाखल होत असल्याचा दावा करत संघटनेने सरकारला इशारा दिला होता.


महाराष्ट्रातही मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान काही ठिकाणी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते, तर काहींवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया कशी पार पडणार आणि संबंधित गुन्हे किती लवकर मागे घेतले जाणार, याकडे विद्यार्थी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.