२६ नोव्हेंबरच्या मुदतीतच भाजप करणार नवीन सरकार स्थापन ; देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आमदारांची पसंती ….

मुंबई : लोकसभेत महाविकास आघाडीकडून चांगलाच धडा घेत विधानसभेत महायुतीने अत्यंत अचूक रणनीती आखून महाविकास आघाडीला चारीमुंड्या चित करत महायुतीने राज्यात मोठे यश मिळवले आहे . त्यामुळे आता लवकरच नवीन सरकार स्थापन करण्याच्या जोरदार हालचाली सूर झाल्या आहेत. त्यामुळे आता अवघ्या काही तासात राज्यात नवीन सरकार अस्तित्वात येणार आहे. यात कोनाला संधी मिळते याची उत्सुकता लागली आहे.
महाराष्ट्र विधानसभेची २६ नोव्हेंबर रोजी मुदत संपत असल्याने त्यापूर्वी नवे सरकार स्थापन करणे गरजेचे असल्याने भाजपकडून येत्या ४८ तासांत नवे सरकार बनवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे.
नवे सरकार भाजपच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती असून सोमवार, २५ नोव्हेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर नव्या सरकारचा शपथविधी होणार असल्याचे सूत्रांकडून कळते.
भाजपने सर्वाधिक १३३ जागा जिंकल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मोठा विजय प्राप्त केल्याने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आमदारांतून पसंती मिळू शकते.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला दोनतृतीयांश बहुमत मिळवल्यानंतर आता नवीन सरकार स्थापनेसोबत नवा मुख्यमंत्री कोण? याचे वेध राज्यातील जनतेला लागले आहेत.
भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीने जबरदस्त विजय मिळवला असला तरी महायुतीतील मित्रपक्षांशी भाजप नेतृत्वाला सल्लामसलत करावी लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर भाजप आमदारांच्या बैठकीत भाजपचा विधिमंडळ गटनेता ठरवला जाईल.
यात देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर असून, याचा फैसला रविवारी सायंकाळपर्यंत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.