देशात १ मे पासून बदलणार महत्त्वाचे नियम, सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम, जाणून घ्या…

नवी दिल्ली : १ मे २०२५ पासून आपल्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणारे काही महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या आर्थिक व्यवहारांवर होणार आहे. बँक व्यवहार, एटीएम शुल्क, रेल्वे तिकीट बुकिंग, गॅस सिलेंडरच्या किमती यामध्ये महत्त्वाचे बदल होणार असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
नवीन नियम लागू झाल्याने दैनंदिन जीवनात काही प्रमाणात आर्थिक भार वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एटीएम व्यवहारांच्या संदर्भात रिझर्व्ह बँकेचे नवीन नियम लागू होणार आहेत. फ्री लिमिट ओलांडल्यानंतर एटीएममधून रोख रक्कम काढण्याचे शुल्क प्रति व्यवहार ₹१७ वरून ₹१९ पर्यंत वाढणार आहे.
तसेच, बॅलन्स तपासणीसाठीचे शुल्क ₹६ वरून ₹७ प्रति व्यवहार इतके होणार आहे. त्यामुळे ATM वापरणाऱ्या ग्राहकांना आता जास्त शुल्काचा सामना करावा लागणार आहे.
रेल्वे प्रवाशांसाठी १ मेपासून मोठा बदल होणार आहे. स्लीपर किंवा एसी डब्यांमध्ये वेटिंग तिकीट घेतल्यास प्रवास करता येणार नाही. वेटिंग तिकिटावर प्रवास करण्यासाठी केवळ सामान्य डबे उपलब्ध असतील. शिवाय, आगाऊ आरक्षणाची मुदत १२० दिवसांवरून ६० दिवसांपर्यंत कमी करण्यात आली आहे. यामुळे रेल्वे तिकीट आरक्षणाचे नियोजन करताना प्रवाशांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
दर महिन्याच्या सुरुवातीस गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होतोच. १ मे रोजी एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे. सिलेंडरच्या किमतीत बदल झाल्यास घरगुती अर्थसंकल्पावर थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे गॅस ग्राहकांनीही किमतीकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
एफडी आणि बचत खात्याच्या नियमांमध्येही १ मेपासून काही बदल होण्याची शक्यता आहे. काही बँका त्यांच्या एफडीवर मिळणाऱ्या व्याजदरांमध्ये बदल करू शकतात. त्यामुळे ज्यांनी एफडी गुंतवणूक करण्याचा विचार केला आहे, त्यांनी नवीन दरांची माहिती घेऊनच निर्णय घेणे योग्य ठरेल.
देशातील ११ राज्यांमध्ये ‘एक राज्य, एक आरआरबी’ धोरणांतर्गत प्रादेशिक ग्रामीण बँकांचे विलीनीकरण होऊ शकते. यामध्ये आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीर या राज्यांचा समावेश आहे. विलीनीकरणानंतर बँकांची कार्यक्षमता वाढण्याची आणि ग्राहकांना सुधारित सेवा मिळण्याची अपेक्षा आहे.