महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट! उष्णतेची लाट आणि गारपिटीचा धोका, काळजी घेण्याचे आवाहन..


पुणे : हवामान खात्याने राज्यातील 15 जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे येणाऱ्या काळात काळजी घ्यावी लागणार आहे. महाराष्ट्रात हवामान बदलाचा मोठा फटका बसणार असून, राज्यात 24 एप्रिलपासून उष्णतेच्या लाटेसोबतच गारपीट आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

याबाबत हवामान विभागाने नागरिकांना दुपारच्या काळात शक्यतो घराबाहेर न पडण्याचे, भरपूर पाणी पिण्याचे आणि थेट सूर्यप्रकाशापासून संरक्षण घेण्याचे आवाहन केले आहे. विजांच्या कडकडाटाच्या वेळी उघड्यावर किंवा झाडांखाली थांबू नये. पुढील काही दिवस हवामानाच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतात, असेही सांगण्यात आले आहे.

त्यामुळे स्थानिक हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. 24 एप्रिल रोजी अमरावती, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसच्या वर जाण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, विशेष कारणाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा इशारा देण्यात आला आहे.

उर्वरित विदर्भ आणि मराठवाडा भागांमध्ये यलो अलर्ट जाहीर करण्यात आला असून, तापमानात 2-3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. 26 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे, 27 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, घाटमाथा, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलक्यापासून मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तसेच हवामान विभागानुसार बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची दाट शक्यता असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. याबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!