राज्यात उष्णतेचा कहर वाढला; विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी, दुपारी 12 ते 4 घराबाहेर न पडण्याचे हवामान विभागाचे आवाहन

मुंबई : राज्यात उष्णतेची लाट कायम आहे. काल तीन जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला. उष्णतेने कहर केला. पुढील दोन दिवस राज्यातील तीन जिल्ह्यांना अतितिव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला. विदर्भतील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असणार आहे.

काही जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषक वातावरणही मिळतंय. अकोला, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात रेड अलर्टनंतर उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. पुढील दोन दिवस या तिन्ही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असणार. गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर आणि गोदिंया या जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवस उष्णतेची लाट असणार आहे.
मात्र, दुसरीकडे रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. अहिल्यानगर, सांगली, ठाणे, रायगड, बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पुढील 3 दिवस ढगाळ वातावरण असेल. हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

राज्यात दुहेरी वातावरण बघायला मिळत आहे. कुठे पाऊस तर कुठे उष्णतेचा कहर. त्यामध्येच आजही भारतीय हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा मोठा इशारा देण्यात आला. नागरिकांनी शक्यतो दुपारी अतिमहत्वाच्या कामाशिवाय 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळावे. गोंदिया जिल्ह्यात 44 ते 45 अंशावर तापमान आले असून वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताच्या घटना पुढे येत आहेत.

भंडारा जिल्ह्यात 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, यंदाच्या उन्हाळ्यातील हा सर्वाधिक उष्ण दिवस ठरल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. प्रखर उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक लस्सी, लिंबू सरबत व अन्य शीतपेयांच्या दुकानांकडे मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.