शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! माळेगाव साखर कारखाना देणार ऊस उत्पादकांच्या उसाला प्रतिटन २०० रुपये कांडेबिल…

बारामती : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत दि. माळेगाव सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मधील सभासदांच्या उसाला प्रतिमेट्रिक टन २०० रुपये कांडेबिल जाहीर केले आहे. साखर उद्योग विविध आर्थिक आव्हानांचा सामना करत असतानाही सभासदांच्या हिताला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे.

कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक शनिवारी (६ जून) पार पडली. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. कारखान्याच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि उपाध्यक्षा संगिता कोकरे यांनी याबाबत माहिती दिली.
ऊस गाळप हंगाम संपल्यानंतर शेतकऱ्यांना पुढील लागवडीसाठी जमिनीची मशागत, शेतीची पूर्वतयारी तसेच नवीन शैक्षणिक वर्षात मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने कांडेबिल देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.

या निर्णयासाठी कारखान्याने सुमारे १५ कोटी ३५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. मागील गाळप हंगामात कारखान्याने ७ लाख ६७ हजार ७४७ मेट्रिक टनांहून अधिक ऊसाचे गाळप केले होते.

विशेष म्हणजे, शासनाने जाहीर केलेली एफआरपी ३,२६९ रुपये प्रतिटन असताना माळेगाव कारखान्याने सभासदांना ३,३०० रुपये प्रतिटन इतकी पूर्ण एफआरपी अदा केली आहे. राज्यातील अनेक साखर कारखान्यांकडे एफआरपीची थकबाकी असताना माळेगाव कारखान्याने वेळेत देयके अदा करून वेगळी ओळख निर्माण केली आहे.
साखर उद्योगावरील आर्थिक दबावाच्या पार्श्वभूमीवर कांडेबिल जाहीर करणारा माळेगाव हा राज्यातील पहिला साखर कारखाना ठरल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी कारखान्याने सभासदांना विविध फळझाडांची रोपे वाटप करण्याचाही निर्णय घेतला आहे. आंबा, नारळ, काजू, चिंच, जांभूळ, दालचिनी आणि सुपारी यांसारख्या झाडांच्या रोपांचे वितरण करण्यात येणार असून, पर्यावरणपूरक उपक्रमात सभासदांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कारखाना प्रशासनाने केले आहे.