कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबईचा प्रवास आरामदायी होणार, लवकरच धावणार वंदे भारत…

कोल्हापूर : कोल्हापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता मुंबईचा प्रवास अधिक जलद आणि आरामदायी होणार आहे. कोल्हापूर ते मुंबई मार्गावर लवकरच वंदे भारत गाडी सुरू होणार आहे.
तसेच या गाडीसाठी सातत्याने मागणी होत असून लोकप्रतिनिधींकडून देखील पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत गाडी सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून येत्या १५ दिवसांत ही गाडी सुरू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस ते मुंबई रेल्वे प्रवाशांची संख्या मोठी आहे. या मार्गावर वंदे भारत गाडी सुरू करण्याची मागणी गेल्या काही काळापासून होत आहे. या मागणीला रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे येत्या 15 दिवसांत या मार्गावर वंदे भारत सुरू होण्याची शक्यता आहे.
सध्या कोल्हापूर ते पुणे मार्गावर एक वंदे भारत धावत आहे. 16 सप्टेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या गाडीचे उद्घाटन झाले. ही गाडी कोल्हापूर-पुणे मार्गावर आठवड्यातून तीन दिवस सुरू करण्यात आली आहे.
दर सोमवार, गुरुवार आणि शनिवारी कोल्हापूरहून पुणे तर पुण्याहून कोल्हापूरसाठी दर रविवार, बुधवार आणि शुक्रवारी ही गाडी धावते. या गाडीला प्रवाशांची चांगली पसंती मिळत आहे. त्यातच आता मुंबईसाठी वंदे भारत सुरू होत असल्याने कोल्हापूरसाठी ही दुसरी वंदे भारत असणार आहे.