आगीचा भडका! मुंबईत ४ मजली इमारतीला भीषण आग, २ तरुणांचा होरपळून मृत्यू

मुंबई :मुंबईतील अंधेरी पूर्वच्या चांदिवली परिसरात इमारतीला भीषण आग लागली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही आग इतकी भीषण होती की, या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्वच्या चांदिवली परिसरातील साकी विहार रोडवरील नारायण प्लाझा या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील एका कारखान्याला भीषण आग लागली. बुधवारी संध्याकाळी ही आग लागली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तब्बल ३ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली.
भगवान पितळे (३० वर्षे),सुमंत जाधव (२८ वर्षे) असं आगीत हरपळलेल्या तरुणांचं नाव आहे. या तरुणानां रुग्णालयात नेण्यात आले. दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषीत केले आहे. या आगीत कारखान्यातील इलेक्ट्रिकल वायरिंग, फर्निचर, लिथियम-आयन बॅटरी, ऑफिसच्या फाईल्स, लाकडी पार्टीशन आणि फॉल्स सीलिंग पूर्णपणे जळून खाक झाले.

दरम्यान आग आटोक्यात आल्यानंतर, अग्निशमन दलाच्या जवानांनी कुलिंग ऑपरेशन सुरू केले जे रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आगीचे कारण सध्या शोधले जात आहे. पण ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे
