माळेगाव कारखाना निवडणुकीपूर्वी मोठी खळबळ! अजित पवारांकडून मतमोजणीची जागा बदलण्यासाठी दबाव? रंजन तावरे यांनी सगळंच सांगितलं….

बारामती : गेल्या काही दिवसांपासून बारामती येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरले असून मीच चेअरमन होणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. यामुळे गेल्या आठ दिवसांपासून ते बारामती तळ ठोकून आहेत.
यामुळे या कारखान्याच्या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. असे असताना दोन दिवसांपूर्वी बारामतीत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक रात्री 11 वाजेपर्यंत सुरू असल्याचे दिसून आले. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप होत असल्याचे आरोप विरोधकांकडून अजित पवार यांच्या गटावर केला आहे.
हा प्रकार चालू असतानाच आता अजून एक धक्कादायक आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. विरोधी पक्षाचे रंजन काका तावरे यांनी मतमोजणीची जागा बदलण्याचा घाट घातला असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला आहे.
यामुळे बारामतीच्या कार्यक्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत रंजन काका तावरे म्हणाले, प्रशासनाने शिवतीर्थ या ठिकाणी मतमोजणी करण्यासाठी तयारी सुरू केली होती. याठिकाणी सामान देखील आणून टाकले आहे. मात्र अजित पवारांच्या दबावामुळे ही जागा बदलण्याचा घाट घालण्याचे काम सुरू आहे.
या ठिकाणी मतमोजणी करण्यासाठी सर्व आवश्यक सुविधा देखील उपलब्ध आहेत. यामुळे ही जागा नेमकी का बदलायची असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच हे सामान देखील उचलून नेण्यास त्यांनी विरोध दर्शवला आहे. यामुळे वातावरण तापले आहे.
रंजन काका तावरे म्हणाले, या ठिकाणी लग्नाचे कारण दिले जात असून या ठिकाणी ज्या नावाने लग्नाचे बुकिंग केले आहे, त्या मुलीचे लग्न कोरोना काळात झाले आहे. इतकं खोटं आणि चुकीचं या ठिकाणी कृत्य सत्ताधाऱ्यांकडून केलं जात असल्याचा थेट आरोप रंजन काका तावरे यांनी केला आहे.