राज्यावर दुहेरी संकटाचा इशारा, थेट हाय अलर्ट जारी, मोठा धोका….,सतर्क राहण्याचं आवाहन

पुणे : राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. हवामान तज्ञ एस. डी. सानप यांनी मोठी माहिती दिली. उष्णतेसह अवकाळी पावसाचा धोका निर्माण झाला आहे.

15 एप्रिल 2026 रोजी भारतीय हवामान विभागाने राज्यासाठी गंभीर इशारा दिला आहे. एकीकडे तापमान झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने नागरिकांसाठी परिस्थिती चिंताजनक बनली आहे.
पुढील चार दिवसांत राज्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे. एकीकडे पारा वाढत आहे तर दुसरीकडे पावसाचा इशारा देण्यात आला. काही दिवसांपूर्वीच राज्यात अवकाळी पावसाने मोठे थैमान घातल्याचे बघायला मिळाले.

त्यानंतर पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला. विदर्भासह पुण्यातही चाळीशी पार तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने सोलापूर शहर आणि जिल्ह्याला उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे.

काल जिल्ह्यात 43.2 डिग्री सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झाली. पुढील आठवडाभर सोलापूर शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची लाट असणार आहे. नागरिकांनी गरज असल्यास घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले. याशिवाय उपाययोजना म्हणून उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आलीय.
विदर्भात उष्णतेची लाट पुन्हा तीव्र होऊ लागली. नागपूरमध्ये काल 42.2अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. अकोल्यात सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले. एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसानंतरचा गारवा संपला. दोन दिवसांत तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ झाली. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवर वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसत आहे.
पुढील तीन-चार दिवसपर्यंत वातावरण कोरडे व उष्णतेची लाट कायम राहणार असल्याने घराबाहेर जाताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. नंदुरबारमध्ये उन्हाचा तडाखा वाढला तापमान 42 अंशांवर गेले. जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याने नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
छत्रपती संभाजीनगरला अवकाळीचा इशारा देण्यात आला. तीन दिवस ऑरेंज-यलो अलर्ट जारी करण्यात आला. गेल्या दोन दिवसांपासून तापमानात वाढ होत असताना छत्रपती संभाजीनगरकरांना आता अवकाळी पावसाचा सामना करावा लागणार आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात 15 आणि 16 एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला.