“मोबाईलवर हप्त्याचा संदेशच आला नाही?” पीएम किसानच्या २३ व्या हप्त्याआधी शेतकऱ्यांची धावपळ; तुम्हीही ‘ही’ चूक तर नाही ना केली?

पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असताना अनेक शेतकरी मात्र चिंतेत पडले आहेत. कारण गेल्या वेळी अनेकांच्या खात्यात २२ वा हप्ता जमा झाला नव्हता. त्यामुळे आता “मागचा हप्ता अडकला, तर पुढचाही मिळणार नाही का?” असा सवाल मोठ्या प्रमाणात उपस्थित केला जात आहे. मात्र यामागचे खरे कारण आता समोर आले आहे.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हप्ता बंद होण्यामागे बहुतेक वेळा छोट्या तांत्रिक चुका कारणीभूत ठरत आहेत. ई-केवायसी अपूर्ण असणे, आधार कार्ड आणि बँक खात्यातील नावात फरक असणे, जमीन पडताळणी न होणे किंवा बँक खाते आधारशी जोडलेले नसणे यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पैसे अडकले आहेत. त्यामुळे २२ वा हप्ता न मिळाल्याने २३ वा हप्ता कायमचा बंद होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, जर शेतकऱ्यांनी वेळेत माहिती दुरुस्त केली तर मागील थांबलेला हप्ताही पुढील हप्त्यासोबत खात्यात जमा होऊ शकतो. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना तातडीने माहिती तपासून अद्ययावत करण्याचे आवाहन केले आहे.

शेतकऱ्यांनी पीएम किसानच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘फार्मर कॉर्नर’मधील ‘नो युवर स्टेटस’ हा पर्याय निवडून माहिती तपासावी. ‘ई-केवायसी’ किंवा ‘लँड सीडिंग’समोर ‘नो’ दिसत असल्यास जवळच्या सेवा केंद्रावर जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड योग्य आहे का, याची खात्री करणेही गरजेचे आहे.

दरम्यान, १३ मार्च २०२६ रोजी २२ वा हप्ता वितरित करण्यात आला होता. मात्र अनेक शेतकऱ्यांना तो मिळाला नव्हता. आता २३ व्या हप्त्याआधी शेतकऱ्यांनी तांत्रिक चुका दूर केल्यास थांबलेली रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
सरकारकडून पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये सन्मान निधी दिला जातो. हा निधी तीन टप्प्यांत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. त्यामुळे कोणतीही चूक टाळण्यासाठी कागदपत्रे आणि माहिती वेळेत अद्ययावत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले जात आहे.