धनंजय मुंडेंचा राजीनामा खरंच मंजूर झालाय का? त्यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे वेगळीच माहिती आलीय समोर…

मुंबई : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा मुख्यसूत्रधार असल्याचे समोर आले आहे. सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून याबाबत माहिती समोर आली आहे. त्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीचे फोटो समोर आले आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला.
असे असताना धनंजय मुंडे यांच्या एक्स अकाऊंटवरुन एक पोस्ट करण्यात आली आहे, त्यामध्ये धनंजय मुंडे यांचा उल्लेख मंत्री, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, महाराष्ट्र राज्य असा करण्यात आला आहे. यामुळे धनंजय मुंडे यांच्या सोशल मीडियातील एका पोस्टमुळे त्यांनी खरोखर मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे का, राज्यपालांनी तो मंजूर केला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यामुळे राजीनामा खरोखर झाला आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यांच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला देण्यात आली नव्हती, त्यामुळेही वाद निर्माण झाला होता. त्यांनी राजीनामा नैतिकतेच्या आधारावर दिला की आरोग्याच्या कारणामुळे यावरुनही वाद सुरु होता. त्यात आता त्यांनी त्यांच्या नावापुढे ‘मंत्री’ असा उल्लेख केल्यामुळे, धनंजय मुंडे यांचा राजीनामा खरंच झाला आहे का? अशी चर्चा होत आहे.
याबाबत सभागृहात अजून कोणती माहिती दिली नसल्याने याची जोरदार चर्चा सुरु असून याबाबत सरकारवर टीका केली जात आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्याच दिवशी काळजाचा थरकाप उडवणारे फोटो आणि व्हिडिओ समोर आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात झाला.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर येऊन धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती दिली. अजित पवारांनीही राजीनाम्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा दिल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. मात्र विधानसभेचे अधिवेशन सुरु असताना सभागृहाला राजीनाम्याची माहिती दिली नाही.
तसेच धनंजय मुंडे यांनी ट्विट करत आपण आजारी असल्याने राजीनामा दिला असल्याचे सांगितले. यामुळे खरोखर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला का? आणि सरकारने तो स्वीकारला का, असे प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्याकडूनच राजीनाम्यावर प्रश्नचिन्ह लावणारी पोस्ट समोर आली आहे.