उपमुख्यमंत्री अजित पवारांची पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी ग्वाही, दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात..

पुणे : राज्यात मध्यंतरी झालेल्या मोठ्या पावसामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली. अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले.आता या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी ग्वाही दिली आहे. सरकारने जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजनुसार संपूर्ण मदत दिली जाईल. दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल,असं त्यांनी म्हटलं आहे.

सरकारकडून शेतकऱ्यांना ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना जाहीर केलेले पॅकेज आजवरचे सर्वांत मोठे पॅकेज असल्याचा दावा अजित पवार यांनी केला. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या संकटात केंद्र सरकार पूर्ण सहकार्य करेल.अहवाल परिपूर्ण झाल्यानंतरच केंद्राला पाठवण्यात येईल. त्यानंतर केंद्र सरकारचे पथक पाहणी करेल व त्याचा अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर केंद्र सरकारची मदत राज्याला मिळेल.दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना कोणत्याही स्थितीत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत,’ असेही पवार यांनी सांगितले.

दरम्यान दी पूना मर्चंट्स चेंबरतर्फे पूरग्रस्तांना चिवडा आणि लाडू मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. लोकांकडे पैसा असतो; पण मदत करण्यासाठी दातृत्व लागते. कष्टाने मिळवलेल्या पैशातील थोडा हिस्सा पूरग्रस्तांना दिला तर समाधान मिळते,’ असे उद्गार उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी काढले. त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

