कर्जमाफीवर आजच निर्णय? बच्चू कडू आक्रमक, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष…

पुणे : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिक असून. महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा’च्या माध्यमातून बच्चू कडू यांनी हा लढा प्रत्यक्ष मैदानात उतरून लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

तसेच या मोर्चाला राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून, मोर्चा आज नागपूरच्या दिशेने रवाना झाला आहे. सरकारने शेतकरी कर्जमाफीवर बोलावलेल्या बैठकीत उपस्थित राहणार नसल्याचं बच्चू कडू यांनी जाहीर केलं आहे.
दरम्यान, त्यांनी स्पष्ट इशारा दिला चार ते पाच वाजेपर्यंत वाट पाहणार, नंतर रामगिरी बंगल्यावर कूच करू, असा अल्टिमेटम त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना बच्चू कडू म्हणाले, घराघरातून प्रत्येक शेतकरी जात, पात, पंथ, पक्ष बाजूला ठेवून नागपूरकडे येत आहे. मुख्यमंत्री साहेबांशी काल आमची मेसेजद्वारे चर्चा झाली. पण आम्ही नागपूरला गेलो तर इथले नेतृत्व कोण करणार?

त्यांनी पुढे सांगितले की, सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. “ही एक-दोन दिवसांची लढाई नाही. रायगडपासून आमचं उपोषण सुरू आहे. आम्ही चार ते पाच वाजेपर्यंत अत्यंत शांततेच्या मार्गाने लढा सुरू ठेवणार आहोत. मात्र, निर्णय न घेतल्यास आम्हाला रामगिरी बंगल्याकडे कूच करावं लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
बच्चू कडू यांनी सरकारला स्पष्ट संदेश दिला, मुख्यमंत्र्यांनी तीन ते चार वाजेपर्यंत निर्णय घेतला पाहिजे. आम्ही लेखी निर्णयाशिवाय मागे हटणार नाही. काही ठिकाणी शासन निर्णय काढावे लागतील, काही ठिकाणी परिपत्रक जारी करावे लागतील, ते काढावेत. अन्यथा आम्ही रामगिरी बंगल्यावर पोहोचू.