छत्रपती शिवाजी महाराज १०० टक्के सेक्युलर होते, महाराजांनी अफझल खानाची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली- नितीन गडकरी


मुंबई : प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकांचा प्रकाशन सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात गडकरींनी भाषण केले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज कसे होते? त्यांनी राज्याचा कारभार कसा चालवला? याबाबतची वक्तव्ये केली आहेत.

नितीन गडकरी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे असे राजे होते जे १०० टक्के सेक्युलर होते, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत अनेक लढाया जिंकल्या पण त्यांनी कधीही मशिदीवर हल्ला केला नाही. लढाई जिंकल्यानंतर महिला शरण आल्या त्यावेळी ते सन्मानाने वागले, छत्रपती शिवाजी महाराज हे संवेदनशील राजे होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र इंग्रजी भाषेत येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा इतिहास, कार्य-कर्तृत्व याबाबत महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांमध्ये अनेक गैरसमज होते. मी इतकेच सांगेन की लहानपणापासून आमच्या हृदयात आई-वडिलांहूनही महत्त्वाचे ज्या व्यक्तीचे स्थान होते, त्या व्यक्तीचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे.

महाराज एक आदर्श शासक होते, न्यायप्रिय होते, कल्याणकारी राजे होते, आदर्श पिताही होते. रामदास स्वामींनी त्यांचे यथार्थ वर्णन केले आहे, यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी.अफझल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतापगडावर जेव्हा भेट झाली तेव्हा अफझल खानाने छत्रपती शिवरायांवर वार केला.

नंतर महाराजांनी खानावर वार केले. यामध्ये अफझल खानाचा मृत्यू झाला, त्यानंतर शिवाजी महाराजांनी अफझल खानाची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधा, असे आदेश दिले. आजकाल सेक्युलर हा शब्द खूप प्रचलित आहे. या शब्दाचा इंग्रजी डिक्शनरीत दिलेला अर्थ धर्मनिरपेक्षता नाही. सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे सर्वधर्मसमभाव.

सगळ्या धर्मांशी न्यायाने वागणे हा सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे असे राजे होते जे १०० टक्के सेक्युलर होते, अशी माहिती यावेळी गडकरींनी दिली. तसेच ते म्हणाले, आजकाल अनेक लोक आपल्या मुला-मुलींसाठी तिकिट मागत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे वैशिष्ट्य हेच होते की राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारांमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व परिपूर्ण होते, असेही नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!