औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकारचं संरक्षण, कबर हटवण्याचा अध्यादेश काढण्याची हिंमत आहे का? राज्यात नेमकं चाललंय काय?

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापले आहे. औरंगजेबाची कबर काढून टाका अशी मागणी अनेकांनी केली आहे. आता विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलही आक्रमक झाले आहेत. यामुळे राज्यात महत्वाचे विषय बाजूला जाण्यासाठी हे कृत्य केले जात असल्याचे दिसून येत आहे.
आता औरंगजेबाची कबर शासनाने लवकरात लवकर हटवावी, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आज राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रात, देशात राज्य कोणाचे आहे? त्यांचेच आहे. मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे कोणाचे आहेत, या विचारांच्या लोकांचे आहेत. मग त्यांना कबर हटवायला कोणी अडवलं? शासनाने हटवावी ना.
मारामाऱ्या कशाला करता? नाटकं कशाला करता? लोकांना त्रास का देता? आरएसएसला सांगा फर्मान काढा. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद हे आरएसएसचेच पिल्लं आहेत, भाजपची पिल्लं आहेत. मग हे सगळं वातावरण खराब करून लोकांना त्रास देण्यापेक्षा तुम्ही शासकीय अध्यादेश काढा, हिंमत आहे का काढायची? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
या क्षणी औरंगजेब कबरीच्या भोवती केंद्र सरकारचा पोलीस दल आहे. मग ते का ठेवला संरक्षणासाठी? केंद्र सरकारचे पोलीस दल आणि ती जागा सरकारच्या अखत्यारीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय शौर्य या महाराष्ट्राला, देशाला दाखवलं,
त्याचे स्मारक म्हणजे औरंगजेबाची कबर. महाराष्ट्रावरती हल्ला करणाऱ्याआधी किंवा महाराष्ट्राचे पंगा घेण्याआधी त्या व्यक्तीने संभाजीनगरला जावे आणि औरंगजेबाची कबर पाहावी. मग महाराष्ट्राच्या वाट्याला यावं, असं आम्ही सांगतो. असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. यामुळे येणाऱ्या काळात अजूनच वातावरण तापणार आहे.