‘जगण्याची आशाच संपली!’ कल्याणच्या लॉजमध्ये सख्ख्या भाऊ-बहिणीचे टोकाचे पाऊल; बेरोजगारीच्या वेदनेचा धक्कादायक शेवट

कल्याण : ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली असून बेरोजगारीमुळे निर्माण होणाऱ्या मानसिक तणावाचे गंभीर वास्तव पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. स्टेशन परिसरातील ‘महाराष्ट्र लॉज’मध्ये वास्तव्यास असलेल्या सख्ख्या भाऊ-बहिणीने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. वेळेत उपचार मिळाल्यामुळे दोघांचे प्राण वाचले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, आत्महत्येचा प्रयत्न करणारा भाऊ ५६ वर्षांचा तर बहीण ५३ वर्षांची आहे. दोघेही मूळचे आसनगाव येथील रहिवासी असून काही कामाच्या शोधात कल्याणमध्ये आले होते. मात्र, दीर्घकाळ रोजगार न मिळाल्याने आर्थिक अडचणी वाढत गेल्या. त्यातूनच मानसिक नैराश्य आले आणि अखेर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने महाराष्ट्र लॉजमध्ये पोहोचले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांना तात्काळ बाहेर काढून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केल्याने दोघांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.


पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून केवळ बेरोजगारीमुळे हा निर्णय घेतला की त्यामागे आर्थिक संकट, कौटुंबिक वाद किंवा इतर कोणते कारण होते, याचाही शोध घेतला जात आहे. लॉजमधील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविण्यासह दोघांच्या पार्श्वभूमीची माहितीही गोळा करण्यात येत आहे.
या घटनेने बेरोजगारी आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रोजगाराचा अभाव, आर्थिक विवंचना आणि सततची असुरक्षितता यामुळे अनेक जण नैराश्याच्या गर्तेत जात असल्याचे तज्ज्ञ सांगतात. अशा परिस्थितीत वेळेत मानसिक आधार, समुपदेशन आणि कुटुंबीयांचा पाठिंबा मिळणे अत्यंत गरजेचे असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे.