पुरंदर विमानतळाला मोठा विरोध! जमीन अधिग्रहणाच्या विरोधात आवाज उठवताना वृद्ध महिलेचा मृत्यू, राजू शेट्टी सरकारवर संतापले..


पुरंदर : पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाच्या विरोधात आवाज उठवताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. यामुळे माजी खासदार शेतकरी नेते राजू शेट्टी चांगलेच संतापले. ते म्हणाले, शेतकरी आपल्या जमिनीला फक्त मालमत्ता मानत नाही, ती त्याची जिवंत आई असते.

तिच्यावर त्याने आयुष्य घालवलेलं असतं, पिढ्यानपिढ्या तिच्या कुशीत घाम, अश्रू आणि माया मिसळलेली असते. हीच माया आणि हीच नाळ कापण्याचा प्रयत्न जेव्हा सत्तेच्या बळावर होतो, तेव्हा त्याचा परिणाम फक्त जमीन जाण्यापुरता मर्यादित राहत नाही, तो हृदयात खोल जखमा करून जातो. अंजनाबाई कामथे या वृद्ध शेतकरी महिलेला ही जखम सहन झाली नाही.

पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाच्या विरोधात आवाज उठवताना अंजनाबाईंनी आपला प्राण गमावला ही फक्त एक व्यक्तीची आकस्मिक मृत्यूची घटना नाही, ही व्यवस्थेच्या जुलमी धोरणांची साक्ष आहे. ज्यांच्या आयुष्याची अखेरची वळणं शांतीत जावी अशी अपेक्षा असते, त्या वृद्ध शेतकरी महिलेला आपल्या जमिनीच्या दु:खाने मरण यावं, ही आपल्या समाजासाठी लज्जास्पद बाब आहे.

प्रश्न असा आहे की, विकासाच्या नावाखाली का नेहमी दुर्बलांचंच बलिदान घेतलं जातं? का कोणी एअरपोर्ट किंवा महामार्ग सत्ताधाऱ्यांच्या बंगल्याच्या जागेत उभा करत नाही? ही शेतजमीन केवळ माती नाही, ती अन्ननिर्मितीचं माध्यम आहे, संस्कृतीचं केंद्र आहे. आणि या सगळ्याचा गळा घोटून जर विकास घडत असेल, तर तो विकास नसून विनाश आहे. अंजनाबाईंचा मृत्यू आपल्याला विचारायला लावतो, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

दरम्यान पुरंदरमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पाला स्थानिक सात गावांतील शेतजमीन मालकांचा तीव्र विरोध आहे. पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. नंतर याविरोधात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!