मोठी बातमी! लाडक्या बहिणींना शेवटची संधी, हाती फक्त 12 दिवस, अन्यथा…

पुणे : महायुती सरकार सत्तेत आणण्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा मोलाचा वाटा ठरला.. या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र अनेक महिलांना ई-केवायसी करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महिलांना ई केवायसी पूर्ण करण्यासाठी सरकारने 18 नोव्हेंबर 2025 ची अंतिम मुदत दिली आहे. त्यामुळे केवायसी पूर्ण नाही झाली तर अनेक महिलांचा लाडकी बहीण योजनेचा हफ्ता बंद होण्याची शक्यता आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या एकूण २.४० कोटी लाभार्थी महिलांपैकी अद्यापही दोन-तृतीयांश महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे. त्यामुळे त्यांनी 18 नोव्हेंबर पर्यंत इ केवायसी करणे बंधनकारक आहे.सध्या केवळ ८० लाख महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित सुमारे १ कोटी ६० लाख महिलांना वेळेत ई केवायसी पूर्ण करावी लागणार आहे. अन्यथा, हप्ता बंद होण्याची शक्यता आहे. ई-केवायसीच्या या गतीमागे अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी आहेत. यामध्ये सर्वात मोठी समस्या विधवा आणि घटस्फोटीत स्त्रियांच्या केवायसीमध्ये येत आहे.
ई-केवायसी करताना लाभार्थी महिलेला स्वतःच्या आधार कार्डासोबतच, कुटुंबातील सदस्याचा (पती किंवा वडिलांचा) आधार क्रमांक आणि ओटीपी प्रक्रियेतून पडताळणी करावी लागते. ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत, त्यांना आधार क्रमांकाची माहिती देणे किंवा त्यासंबंधीचा ओटीपी मिळवणे शक्य होत नाही. यामुळे या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना केवायसी करावी लागणार आहे.

दरम्यान लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी ई-केवायसी गरजेची आहे. मात्र तांत्रिक अडचणींमुळे अनेक गरजू महिलांना लाभ मिळण्यापासून वंचित राहू शकतात, असे बोललं जात आहे. आता महिला व बालविकास विभागाने याची दखल घेतली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या समस्येची कबुली दिली आहे. महिलांच्या अडचणी लक्षात घेऊन तांत्रिक प्रणालीत सुधारणा करण्याचे आणि पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती तटकरे यांनी दिली आहे.
