रायगडमध्ये मोठी दुर्घटना! समुद्रात बोट बुडाली, युद्धपातळीवर बचावकार्य चालू…


पुणे : गेल्या तीन दिवसांपासून मुंबई, उपनगर तसेच सागरी किनाऱ्यावरील भागांत पावसाने धुमाकूळ घातलाय. या पावसामुळे समुद्रालाही आता उधाण आलेले आहे. दरम्यान समुद्राला उधाण आलेले असताना आता रायगडमधील उरण येथे एक बोट दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे.

गुजरातच्या हद्दीतील एक मासेमारी बोट उरणजवळ बुडाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचे व्हिडीओही सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. ही बोट गुजरातच्या हद्दीतील मासेमारी बोट असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या बोट दुर्घटनेचे काही व्हिडीओ समोर आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उरण येथे गुजरातच्या मासेमारांची बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. मात्र पावसाच्या पाण्यासोबत समुद्राचे उधाण वाढल्याने बोटीमध्ये पाणी शिरले आणि अखेर ही बोट थेट बुडाली. बोटीचा पूर्णपणे शोध घेण्याचे काम सुरू असून ती अद्याप सापडलेली नाही.

बोट बुडाल्यावेळी त्यात सात मच्छीमार होते. बचाव पथकांनी तात्काळ मोर्चा उघडत युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले. ही दुर्घटना घडल्यानंतर सातही मच्छीमारांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे.

समुद्राच्या मध्यभागी बुडणाऱ्या बोटीवर अडकलेल्या खलाशांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरसह तटरक्षक दलाच्या टीमने मोठे ऑपरेशन राबवले. काही खलाशी लाईफ जॅकेट घालून पाण्यात उड्या मारताना दिसले तर काहींना दोऱ्यांच्या साहाय्याने वर ओढण्यात आले. या वेळीचा व्हिडीओ पाहून उपस्थितांनाही काळजाचा ठोका चुकला.

दरम्यान, सध्या समुद्र उधाणलेला असल्याने मासेमारीवर बंदी आहे. तरीदेखील काही मच्छीमार आदेश झुगारून समुद्रात उतरत असल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. यापूर्वी अलिबागमध्येही अशीच दुर्घटना घडली होती ज्यात तीन जणांचा मृत्यू झाला होता, तर सहा जणांना वाचवण्यात आले होते. पुन्हा अशाच स्वरूपाची दुर्घटना उरणमध्ये घडल्याने स्थानिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!